भारत-पाकिस्तान : 75 वर्षांचा संघर्ष, तीन थेट युद्ध अन् 'या' 4 वेळा शस्त्रसंधी; असा आहे इतिहास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
टोकाचा तणाव, सशस्त्र संघर्ष आणि त्यानंतर शस्त्रसंधी हा शिरस्ता भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेकदा पाहायला मिळाला आहे.
22 एप्रिल 2025 ला पहलगाम हल्ल्यानंतर तणाव कमालीचा वाढला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने हवाई हल्ले केले. त्यात फक्त पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचं भारताने सांगितलं.
यानंतर दोन्ही बाजूने काही दिवस तीव्र संघर्ष झाला आणि मग अमेरिकेच्या मध्यस्थीने हा संघर्ष थांबवण्यावर सहमती झाली. अर्थात, त्यानंतरच्या काही तासांमध्ये पुन्हा याचं उल्लंघन झाल्याच्या घटनाही समोर आल्या.
भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष अनेकदा झालेत, पण यातले काही टोकाला गेले होते. त्यावेळी गोष्टी कशा निवळल्या? यापूर्वीच्या संघर्षांमध्ये काय घडलं होतं?
कारगिल : 1999
भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्रधारी झाल्यानंतरचा हा पहिला संघर्ष होता. 1999 च्या मे महिन्यात कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केली. भारतीय गुप्तहेर यंत्रणा आणि लष्कराला सुरुवातीला याची काहीच कल्पना नव्हती.
मे महिना आणि साधारण अर्धा जून महिना भारतीय लष्कराला मोठं नुकसानही सोसावं लागत होतं, कारण उंचावरच्या ठिकाणांवर पाकिस्तानी सैनिकांनी ताबा मिळवला होता.
जूनच्या मध्यानंतर मात्र चित्र पालटू लागलं, तोलोलिंगच्या विजयानंतर भारतीय कारवाईला धार येत होती. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी 4 जुलै 1999 ला नवाझ शरीफ वॉशिंग्टन डी. सी. ला गेले.
शरीफ बिल क्लिंटन भेटीदरम्यान तिथे उपस्थित असलेले क्लिंटन यांचे दक्षिण आशिया विषयक घडामोडींचे सल्लागार ब्रूस रायडेल यांनी आपल्या 'अमेरिकाज डिप्लोमसी अँड 1999 कारगिल समिट' या पुस्तकात लिहीलंय की, शरीफ यांची एकांतात भेटण्याची विनंती क्लिंटन यांनी रुक्षपणे नाकारली.

फोटो स्रोत, Getty Images
क्लिंटन म्हणाले, "तुम्ही बिनशर्त आपलं सैन्य मागे घेणार नसाल तर इथे येऊ नका हे मी आधीच सांगितलं होतं. तुम्ही तसं केलं नाहीत तर कारगिल संकटासाठी फक्त पाकिस्तानला दोषी ठरवणाऱ्या एका निवेदनाचा मसुदा माझ्याकडे तयार आहे."
या बैठकीनंतर शरीफ बाहेर आले तेव्हा तिकडे 'टायगर हिल'वर भारताने ताबा मिळवल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या आणि शरीफ यांनी याची मुशर्रफ यांना फोन करून याची खातरजमा करून घेतली होती, असंही तत्कालिन पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सदस्य तारिक फातिमी यांनी लेखिका नसीम जेहरा यांना सांगितलं होतं.
अजून थोडं मागे जाऊया, अशा एका युद्धाकडे ज्याने एका नवीन देशाची निर्मिती झाली.
बांगलादेश मुक्तिसंग्राम : 1971
भारतापासून वेगळं होऊन 1947 साली पाकिस्तान जन्माला आला खरा, पण तो पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा दोन हिश्शात विभागलेला होता.
एकाच देशाच्या या दोन भागांमध्ये अंतर्गत तणाव वाढत होता आणि याचा परिणाम भारतावरही पाहायला मिळत होता.
निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे पूर्व पाकिस्तानातून भारतात येत होते. भारतासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक दृष्टीने याचा ताण पडत होता.
1971 च्या भर उन्हाळ्यात, एप्रिल महिन्यातच पूर्व पाकिस्तानच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने हल्ला करावा असा इंदिरा गांधींचा मानस होता. अखेर डिसेंबर महिन्यात पूर्व पाकिस्तानात भारतीय सैन्याने प्रवेश केला.
बांगलादेशच्या 'मुक्ती बाहिनी'ला मदत करत पाकिस्तानी लष्कराशी थेट संघर्ष झाला. 12 दिवसांच्या लढाईनंतर पाकिस्तानने हार पत्करली आणि 16 डिसेंबर हा शरणागतीचा दिवस ठरला.

पाकिस्तान सैन्याच्या पूर्व कमांडचे प्रमुख जनरल ए ए के नियाझी यांनी भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल जे एस अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या करारावर सह्या केल्या. कमरेचं पिस्तुल आणि गणवेशावरचे बिल्ले काढून देत जनरल नियाझींनी समर्पण केलं.
यानंतर 1972 साली इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला आणि भारताने पाकिस्तानचे 93,000 युद्धकैदी सोडून दिले. 13,000 चौ. किमीचा भाग परत केला. तसंच कोणतेही वाद द्विपक्षीय चर्चेच्या मार्गाने सोडवण्याचं ठरवलं.
आता वळूया भारत – पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या मोठ्या आणि विस्तृत युद्धाकडे.
भारत – पाकिस्तान युद्ध : 1965
1962 च्या चीन युद्धात पराभव, पाठोपाठ जवाहरलाल नेहरूंचं 1964 साली निधन, यापाठोपाठ 1965 च्या ऑगस्ट महिन्यात भारत - पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर संघर्ष सुरू झाला. सीमेवर वेगवेगळ्या भागांमध्ये एकापाठोपाठ एक लढाई होत होती.
17 दिवस चाललेल्या या लढाईत दुसऱ्या महायुद्धानंतरचा चिलखती वाहनांचा आणि रणगाड्यांचा सर्वांत तीव्र संघर्ष पाहायला मिळाला.
पाकिस्तानी हल्ल्यांचं उद्दिष्ट साध्य झालं नाही 20 सप्टेंबर 1965 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने ठराव क्रमांक 211 द्वारे शस्त्रसंधीची घोषणा केली. काश्मीर प्रश्नी तोडगा आणि संघर्षाला तातडीने विराम देण्याचा हा ठराव होता. भारत आणि पाकिस्तानने अनुक्रमे 21 आणि 22 सप्टेंबरला शस्त्रसंधी मान्य केली.

फोटो स्रोत, Kuldeep Nayyar
दोन्ही देशांनी सोव्हिएत रशियाची मध्यस्थी स्वीकारली आणि 10 जानेवारी 1966 ला ताश्कंदमध्ये पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री आणि अयूब खान यांच्यात करार झाला.
पाकिस्तानला हाजी पीर आणि तिथवाल दिल्यामुळे शास्त्रींवर प्रचंड टीका होत होती. पण हा करार केल्यानंतर बारा तासांतच शास्त्रींचा ताश्कंदमध्ये संदिग्ध मृत्यू झाला.
फाळणीनंतर या दोन देशांमध्ये संघर्ष उद्भवायला फार काळ लागला नाही.
स्वातंत्र्यापाठोपाठ संघर्ष : 1947 ते 1949
भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले तरी संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न होताच. यात सर्वांत किचकट प्रश्न होता जम्मू काश्मीरचा.
महाराजा हरी सिंह हिंदू पण संस्थानातली बहुतांश जनता मुस्लीम. हरी सिंह यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण काही काळातच मोठ्या प्रमाणात टोळ्यांची आणि पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी आणि हिंसाचार सुरू झाला.
हरी सिंह यांनी भारतात विलीन होण्याच्या करारावर (instrument of accession) सह्या केल्या आणि भारतीय सैन्य जम्मू काश्मीरच्या मदतीला गेलं. हरी सिंह यांनी सह्या कधी केल्या याबाबत पाकिस्तान कायम संशय घेत आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पं. नेहरूंनी काश्मिरात जनमत चाचणीच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली होती. पण त्यानंतर हा प्रस्ताव कधीही प्रत्यक्षात आला नाही.
पुढे हा वाद संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचला, संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने इथे अखेर शस्त्रसंधी झाली आणि जुलै 1949 मध्ये कराचीमध्ये झालेल्या बैठकीत भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी रेषा ठरवली गेली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)