शिरूर लोकसभा निकाल : अमोल कोल्हेंना सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी, आढळराव पाटलांना पुन्हा पराभूत करणार का?

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, Facebook

शिरूरमध्ये अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभूत करणार का? अशा चर्चा सुरू आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

अजित पवार गटाने शिरूरच्या जागेवर दावा केला होता. त्यामुळे आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून इथून निवडणूक लढवली होती.

हे पाहण्यासाठी जावास्क्रिप्ट असलेला मॉडर्न ब्राऊजर आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे.

निकाल लागण्याची प्रतीक्षा
जिंकण्यासाठी 272 जागांची आवश्यकता
निकाल लागण्याची प्रतीक्षा
पेज अपडेट करण्यासाठी रिफ्रेश करा

आढळराव पाटलांनी त्यांच्या विरोधात चांगली शक्ती पणाला लावली होती. त्यामुळं निकालात नेमकं काय समोर येणार याकड सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.

शिरूर मतदारसंघाची रचना

बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ ‘शिवनेरी’, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ‘वढू-तुळापूर’, ज्ञानेश्वर महाराजांनी जीवंत समाधी घेतलेले ‘आळंदी’, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ राजगुरुनगर (पूर्वीचे खेड) यांसारख्या स्थळांचा समावेश असलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो.

या मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला; तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील, यासाठी सर्वांचाच प्रयत्न असणार आहे.

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांशी ते जवळीक साधून आहेत. आंबेगावमध्ये सलग सात टर्म आमदार असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत महायुतीत सामील झाले आहेत.

खेडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणारे दिलीप मोहिते पाटील यांना अजित पवार यांचे समर्थक मानले जाते. शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे अमोल कोल्हे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत.

भोसरीमधून महेश लांडगे हे या मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. चेतन तुपे पाटील हे हडपसरमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कोल्हेंशी त्यांचे चांगले सख्य आहे.

2019 पूर्वीची परिस्थिती काय होती?

सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच वर्चस्व या मतदारसंघावर होते. मात्र शिवाजी आढळराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेने या मतदारसंघावर आपला भगवा फडकवला.

इतकेच नव्हे, तर मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी एकदा आणि पुनर्रचनेनंतर दोनदा असे एकूण तीन वेळा निवडून येत शिवाजी आढळराव पाटील यांनी हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते.

आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर शिवाजी आढळराव पाटील हे सलग तीन वेळा येथून निवडून आले होते.

शिवाजीराव अढळराव

फोटो स्रोत, shivajiraoadhalrao/facebook

असे म्हटले जाते, की शरद पवार जेव्हा बारामतीबाहेर लढण्यासाठी चाचपणी करत होते आणि शिरूरचा पर्याय जेव्हा समोर आला, त्यावेळी पवारांनी आढळरावांविरुद्ध लढण्यासाठी माघार घेतली होती आणि माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

मतदारसंघातील 4-5 विधानसभा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात असतानादेखील आढळरावांना हरविणे कठीण जात होते. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, तर लोकसभेला आढळराव, असे समीकरण 2019 पर्यंत शिरूरमध्ये पाहायला मिळाले.

2019 च्या निवडणुकीत काय घडले?

‘राजा शिवछत्रपती’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले अमोल कोल्हे यांनी राजकारणाची कास धरत 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

2019 च्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता.

त्यावेळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली होती.

2019 च्या निवडणुकीवेळी शिवाजी आढळराव पाटलांनी टीका करताना, कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला होता. त्यावर ‘मी छत्रपतींचा मावळा’ असे प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार नाही, याची काळजी कोल्हेंनी घेतली होती.

मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजानेदेखील कोल्हेंना मतदान केले होते, असं सांगितलं जातं याचाच फटका आढळरावांना बसला होता.

त्यामुळे गेल्या निवडणुकीत जातीचा मुद्दा तितकासा चालला नसल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी मराठा आणि ओबीसींच्या मोर्च्यांमुळे जातीचा मुद्दा आता कितपत प्रभावी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘संसदरत्न खासदार’ की ‘दांडगा जनसंपर्क असलेला खासदार’ ?

महायुतीकडून जर आढळरावांना तिकीट मिळाले, त्यामुळं ‘कोल्हे विरुद्ध आढळराव’ असा सामना रंगू लागला.

“तीन वेळा संसदरत्न पुरस्कारप्राप्त खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात दिसले नाहीत; केवळ संसदेमध्ये भाषणं करुन निवडून येता येत नाही”, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

तर “खासदारांचे मुख्य काम दिल्लीत असते, त्यांना संसदेत जबाबदारी पार पाडावी लागते; शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत सातत्याने मांडण्याचे काम कोल्हेंनी केलं आहे”, असं कोल्हेसमर्थकांचे म्हणणे होते.

महायुतीकडून जर आढळरावांना तिकीट मिळाले तर मतदार कोणाला पसंती देतील… ‘संसदरत्न खासदार’ की ‘दांडगा जनसंपर्क असलेला खासदार’, अशी चर्चा मतदारसंघात होती.

‘पवार विरुद्ध पवार’ लढत

शिरूर मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात उतरले होते.

पण आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यामुळं पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगलेली पाहायला मिळाली.

शरद पवार

फोटो स्रोत, sharadpawar/facebook

मागच्या वेळी कोल्हेंच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हेंविरोधात शड्डू ठोकल्यानं कोल्हेंना ही निवडणूक कठिण जाणार असं सांगितलं जात होतं.

पक्षफुटीच्या मुद्द्यावरच अधिक चर्चा

यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चेत असतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होते. पण प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला तेव्हा मात्र पक्षातील फूट हात मुद्दा महत्त्वाचा ठरला.

राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार बाहेर गेल्यानं त्या मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांनी रान उठवलं होतं.

तसंच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर कोल्हे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत होतं.

बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यावरूनही कोल्हे यांनी टीका केली, पण शरद पवारांना दगा दिल्याचा प्रचार प्रामुख्यानं करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

हेही नक्की वाचा