बंगळुरूत RCB च्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू, 33 जखमी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.
33 लोक जखमी झाल्याचं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
18 वर्षांनंतर आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या संघाचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक बंगळुरूच्या रस्त्यावर जमले होते.

फोटो स्रोत, Getty Images
नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसी हिंदीला सांगितलं की, जवळपास एक लाख लोक येतील असा अंदाज होता, पण ही संख्या दोन ते तीन लाख असावी असं त्यांनी सांगितलं."

फोटो स्रोत, NDRANIL MUKHERJEE/AFP VIA GETTY IMAGES
अधिकाऱ्याने सांगितले की, "जेव्हा ही घटना घडली तेव्हा स्टेडियमचे गेट उघडे नव्हते आणि मोठ्या संख्येने लोक एका लहान गेटला ढकलून तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि या दरम्यान चेंगराचेंगरी झाली."
पीएमओने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "बंगळुरूमधील अपघात खूप दुःखद आहे. या दुःखाच्या वेळी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो."

फोटो स्रोत, Getty Images
बुधवारी (4 जून) संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता.
18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्सने आयपीएल जिंकला आहे. विराट कोहलीसह बंगळुरू संघाचे खेळाडू आज दुपारी (4 जून) ट्रॉफीसह बंगळुरूमध्ये पोहोचले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर, विधानसभेच्या पायऱ्यांवर स्वागतासाठी बंगळूरचे खेळाडू आलेले होते. तिथे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर मंत्र्यांनी संघाचे स्वागत केले.
त्यानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या संघाची मिरवणूक निघणार होती आणि ते स्टेडियमकडे जाणार होते. पण पाऊस सुरू झाला आणि त्याच वेळी चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर संघ हॉटेलमध्ये परतला.
शहराच्या विविध भागातून लोक मिळेल ते वाहन पकडून स्टेडियमकडे निघाले. यापैकी अनेकांनी 18 नंबरची जर्सी घातलेली होती. स्टेडियमकडे जाणाऱ्या मेट्रो ट्रेन्स भरल्यामुळे आमच्या प्रतिनिधींना देखील त्या मेट्रोमध्ये बसता आलं नाही.

फोटो स्रोत, IDREES MOHAMMED/AFP VIA GETTY IMAGES
स्टेडियमच्या आसपास जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना रिक्षा किंवा टॅक्सी देखील मिळत नव्हत्या. ड्रायव्हर तिथे जाण्यास नकार देत होते. जे ऑटोचालक तयार झाले त्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले. आणि तरीही स्टेडियमपासून तीन किलोमीटर दूरपर्यंतच जात येत होतं.
चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर, लोकांनी मेट्रो स्टेशनकडे गर्दी करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमल्याने मेट्रो अधिकाऱ्यांनी स्टेडियमभोवतीची स्टेशन्स बंद केली.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल फायनलमध्ये बंगळुरूने पंजाब किंग्सचा पराभव करून पहिल्या आयपीएल विजेतेपदाचा गवसणी घातली होती.
हाच विजय साजरा करण्यासाठी आज बंगळुरूमध्ये उघड्या बसमधून एक मिरवणूक निघणार होती पण पोलिसांनी रहदारीमुळे याला परवानगी नाकारली.
त्यानंतर बंगळुरूच्या संघाचे लाल झेंडे घेऊन हजारोंची गर्दी चिन्नास्वामी मैदानाकडे येत असल्याचं दिसलं आणि त्यातच ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.