'आता सर्व काही संपलं'; पहलगाममधील हल्ल्यानंतर स्थानिक व्यावसायिकांची प्रतिक्रिया काय?

पहलगाममधील हल्ल्यानंतर स्थानिक व्यावसायिक म्हणतात, 'आता सर्व काही संपलं'

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, दिव्या आर्य
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या कट्टरतावादी हल्ल्याने जम्मू काश्मीरमधील शांततेला धक्का बसला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेची चिंता अधिक तीव्र झाली आहे. अनेक स्थानिक व्यवसाय आणि हॉटेल्स व्यावसायिक त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यातील पर्यटन उद्योगावर हिंसाचाराचा मोठा परिणाम झाला आहे.

मंगळवारी (22 एप्रिल) पहलगाम या जम्मू काश्मीरमधील थंड हवेच्या ठिकाणी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या हल्ल्यामुळं घाबरलेल्या पर्यटकांना आता जम्मू काश्मीरमधून निघून जायची ओढ लागली आहे. श्रीनगर येथील विमानतळाकडे जाणाऱ्या टॅक्सींची गर्दी सतत वाढत आहे. अनेक पर्यटक हायवेने जम्मू काश्मीरबाहेर निघून जात आहेत.

"आम्हाला भीती वाटत आहे, कारण आम्हाला माहीत नाही की, दहशतवादी कुठे आहेत आणि पुढे काय होईल," असं पर्यटक गौतम यांनी बीबीसीला सांगितलं.

काश्मीरमध्ये येण्यापूर्वीच त्यांनी पुढील काही दिवसांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या. पण आता त्यांना आपल्या राज्यात जाण्याची घाई लागली आहे.

जम्मू काश्मीर अनेक दशकांपासून हिंसाचाराचे केंद्र राहिले आहे. परंतु, पर्यटकांवर होणारे हल्ले दुर्मीळ असतात. यापूर्वी अशा हल्ल्यांच्या घटना क्वचितच घडल्या होत्या.

सर्वात मोठा नागरी हल्ला

जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं, "नागरिकांवर करण्यात आलेला हा हल्ला, गेल्या काही वर्षांतील इतर सर्व हल्ल्यांपेक्षा खूप मोठा आणि भयावह आहे."

वर्ष 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून, या दोन्ही शेजारी देशांनी जम्मू काश्मीरवर दोन युद्धं लढली आहेत. दोघेही हा संपूर्ण भाग आपला असल्याचा दावा करतात, मात्र प्रत्यक्षात त्यातील केवळ काही भागच त्यांच्या ताब्यात आहे.

1980 च्या उत्तरार्धात आणि 1990 च्या दशकात जम्मू काश्मीरमध्ये असंतोष वाढला आणि दहशतवादाचा उद्रेक झाला. भारतानं पाकिस्तानवर या उठावाला मदत व निधी पुरवण्याचा आरोप केला. या अस्थिर आणि अशांत वातावरणात हजारो लोकांनी आपला जीव गमावला.

दहशतवाद कमी झाल्याचा केला होता दावा

गेल्या काही वर्षांत हिंसाचारात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, असा केंद्र सरकारने दावा केला होता. मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले, "2004 ते 2014 या कालावधीत 7,217 दहशतवादी घटना घडल्या, पण 2014 ते 2024 दरम्यान हा आकडा केवळ 2,242 वर आला."

पर्यटन हा जम्मू काश्मीरमधील परंपरागतपणे चालत आलेला व्यवसाय आहे. येथील अर्थव्यवस्थेचा तो एक मोठा आधार आहे. गेल्या काही काळात यात पुन्हा एकदा वाढ झाली होती.

पहलगाममधील हल्ल्यानंतर स्थानिक व्यावसायिक म्हणतात, 'आता सर्व काही संपलं'

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या पर्यटन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये 2 कोटींहून अधिक पर्यटकांनी या प्रदेशाला भेट दिली, जी कोविडपूर्व पातळीपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे.

परंतु, पहलगाममधील हल्ल्याने या वाढलेल्या पर्यटनाला धक्का देण्याची शक्यता निर्माण निर्माण झाली आहे.

आता सर्व काही संपलं...

"सर्व काही संपलं आहे, मला अश्रू अनावर झाले आहेत," अत्यंत उद्विग्न होऊन पहलगामधील शाल विक्रेते शकील अहमद बीबीसीला सांगत होते. ते म्हणाले, "आमचं संपूर्ण आयुष्य पर्यटकांवर अवलंबून आहे. मी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण आता माझा माल मी कोणाला विकायचा");