संदीप देशपांडे: महिला कॉन्स्टेबल धक्काबुक्की प्रकरणात मनसे नेते देशपांडेंना जामीन

फोटो स्रोत, facebook
पोलिसांना धक्काबुक्की करून पळ काढल्याच्या प्रकरणात मनसे नेते संदीप देशपांडे यांना आज अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यासह संतोष धुरींना देखील अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
4 मे रोजी मुंबईत ठिकठिकाणी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर 5 मे रोजी शहरात मनसे नेत्यांचे अटकसत्र सुरू झाले होते. त्यावेळी एका पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देऊन पळ काढल्याचा आरोप लावत मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
4 मे रोजी हनुमान चालिसाहून गोंधळ उडाल्यानंतर पोलिस मनसे नेत्यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते.
त्यावेळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे कारमधून घटनास्थळाहून निसटले होते.
त्यावेळी या झटापटीदरम्यान एक महिला कॉन्स्टेबल खाली पडल्या. त्यामुळे या प्रकरणात संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि संदीप यांचा वाहनचालक यांच्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केला होता.
संदीप देशपांडे यांनी या प्रकरणानंतर एक व्हीडिओ जारी करून आपली बाजू स्पष्ट केली होती.
आपण राज ठाकरे यांना भेटायला गेलो असता पोलिसांनी मला बाजूला नेलं, पण ताब्यात घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं नाही. त्यावेळी आम्ही गाडीत बसत असताना पोलिसांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या ड्रायव्हरने गाडी पुढे नेली. पण आमच्या गाडीच्या पंधरा फूट मागे त्या महिला पोलीस अधिकारी पडल्या होत्या. त्याचा आमच्याशी काहीएक संबंध नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.
मशिदींवरील भोंगे उतरत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार - राज ठाकरे
मुद्दा पहाटेच्या अजानपुरता नाही, दिवसभरात नियमांचं पालन झालं नाही तर हनुमान चालिसा म्हटली जाणार, मशिदींवरील भोंगे खाली उतरत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
"आज सकाळपासून राज्याच्या विविध भागांतून मला फोन येत आहेत. आमचे नेते व कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असल्याची माहिती मिळत आहे. ही गोष्ट आमच्याच बाबतीत का होते"?

"जे लोक कायद्याचं पालन करतात, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार, कायद्याचं पालन न करणाऱ्यांना मोकळीक देणार का"? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
"राज्यात 90 ते 92 टक्के ठिकाणी पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही. मुंबईत 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींवरची पहाटेची अजान लावली गेली. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकार काय कारवाई करणार आहे?
काही ठिकाणी मंदिरांवरही भोंगे आहेत, तेसुद्धा खाली आले पाहिजेत. महाराष्ट्रातील बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत. त्यांना सरकार अधिकृत परवानगी कसं काय देऊ शकतं"? असं ठाकरे यांनी विचारलं.
"फक्त पहाटेच्या अजानपुरता नाही. दिवसभरात नियमांचं पालन झाली तरी त्यासमोर हनुमान चालिसा लावणार. 365 दिवसांची परवानगी देता येत नाही. रोजच्या रोज अथवा सणांपुरती दहा-बारा दिवसांची परवानगी देण्यात येत असते. रोज सकाळी जाऊन यांच्या भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचं काम पोलीस करणार आहेत का");