पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार? अमेरिकेच्या उपाध्यक्षांचं 'ते' वक्तव्यं भारतासाठी किती दिलासादायक?

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असताना आंतरराष्ट्रीय समुदाय आणि विशेषकरून अमेरिका काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांनी पाकिस्तानचा सहभाग आणि पाकिस्ताननं भारताला सहकार्य करण्यासंदर्भात वक्तव्यं केलं.

त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा काय परिणाम होणार, जे डी वेन्स यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, अमेरिका पूर्णपणे भारताच्या पाठिशी उभी राहणार का, याचा भारताला काय फायदा होणार या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वेन्स यांनी फॉक्स न्यूच्या एका कार्यक्रमात पहलगाम हल्ल्याबाबत महत्त्वाचं वक्तव्यं केलं. वेन्स यांनी या हल्ल्यासाठी एका मर्यादेपर्यंत पाकिस्तानला जबाबदार ठरवलं असून पाकिस्तान भारताला सहकार्य करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

24 एप्रिलला दिलेल्या मुलाखतीत जे डी वेन्स म्हणाले की, अमेरिकेला आशा आहे की, अलीकडेच झालेल्या हल्ल्यानंतर 'भारताकडून दिलं जाणारं उत्तर एका व्यापक प्रादेशिक संघर्षात रुपांतरीत होणार नाही.'

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात एका काश्मिरी पोर्टरसह (प्रवाशांचं सामान वाहणारा) 26 जण मारले गेले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देताना भारतानं कित्येक दशकांपासूनचा सिंधू जल करार स्थगित केला. तर पाकिस्ताननं पाणी अडवण्याची किंवा वळवण्याची कोणतीही कृती म्हणजे 'युद्ध' मानलं जाईल, अशा इशारा दिला.

पहलगाम हल्ल्याच्या वेळेस अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स त्यांच्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पहलगाम हल्ल्याच्या वेळेस अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स त्यांच्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर होते.

जे डी वेन्स काय म्हणाले?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, फॉक्स न्यूजच्या 'स्पेशल रिपोर्ट विथ ब्रेट बेयर' या कार्यक्रमात जे डी वेन्स म्हणाले, "या हल्ल्यासाठी पाकिस्तान ज्या कोणत्या मर्यादेपर्यंत जबाबदार असला तरी, भारताला सहकार्य करेल, अशी आम्हाला आशा आहे. जेणेकरून दहशतवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करता येईल."

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआयच्या प्रमुखांची नियुक्ती करण्याचं समर्थन केलं आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआयच्या प्रमुखांची नियुक्ती करण्याचं समर्थन केलं आहे.

"जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, विशेषकरून दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये, तेव्हा आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो", असंही वेन्स यांनी नमूद केलं.

22 एप्रिलला पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळेस जे डी वेन्स त्यांची पत्नी उषा वेन्स आणि मुलांसह भारताच्या दौऱ्यावर होते. हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला होता.

वेन्स यांच्या वक्तव्यावर भारतात काय प्रतिक्रिया उमटली?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एक दिवस आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा फोन कॉल आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांच्या ताज्या वक्तव्याबद्दल भारतात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार आणि जेएनयूमधील प्राध्यापक अमिताभ मट्टू यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "जे डी वेन्स यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की, दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या योग्य प्रतिक्रियेसाठी पूर्ण पाठिंबा आणि पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवरील सक्रिय दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी. तसंच अशी आशा व्यक्त केली की यातून व्यापक प्रादेशिक संघर्ष सुरू होणार नाही."

वरिष्ठ पत्रकार सिद्धांत सायबल यांनी एक्सवर लिहिलं, "भारत-पाकिस्तान तणावासंदर्भात अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांनी भारताला सांगितलं आहे की, या कट्टरतावादी हल्ल्याच्या विरोधात कारवाई करताना व्यापक स्वरुपाचा प्रादेशिक संघर्ष व्हायला नको."

"तसेच पाकिस्तानला सांगितलं आहे की, त्यांनी भारताला सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांना अटक करता येईल."

वरिष्ठ पत्रकार गीता मोहन यांनी एक्सवर लिहिलं, "भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. या गोष्टीची अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांना चिंता वाटते. त्यांना वाटतं आहे की, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पाकिस्ताननं भारताला सहकार्य करावं."

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी फोनवर बोलणं झाल्याची माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी फोनवर बोलणं झाल्याची माहिती दिली आहे.

'मोदी और इंडिया' या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार राहुल शिवशंकर यांनी एक्सवर लिहिलं, "पहलगामचा हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स भारतातच होते. त्यांनी भारतीय आदरातिथ्याचा आनंद घेतला. मात्र एक आठवड्यानंतर देखील ते पाकिस्तानला विनाअट दोषी ठरवू शकलेले नाहीत."

"त्याऐवजी त्यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तान ज्या कोणत्या मर्यादेपर्यंत जबाबदार असेल, तरी त्यानं भारताला सहकार्य केलं पाहिजे."

सुशांत सरीन संरक्षण तज्ज्ञ आहेत आणि ऑब्झर्व्ह रिसर्च फाऊंडेशनमध्ये सीनियर फेलो आहेत.

त्यांनी याला उत्तर देताना एक्सवर लिहिलं, "आपण कोणत्या गोष्टीची तक्रार करत आहोत? आपण वैयक्तिक गोष्टींची राजकीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांशी सरमिसळ करतो आणि स्वत:लाच मूर्ख ठरवतो. गोरे लोक जास्त समजदार आणि व्यावसायिक असतात");