पाकिस्तान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या वक्तव्यावर भारतात किती संताप?

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर
  • Author, फरहत जावेद
  • Role, बीबीसी उर्दू

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर सध्या चर्चेत आहेत.

हल्ली भारत आणि पाकिस्तानशिवाय जगभरातील अनेक देशांमध्येही त्यांच नाव घेतलं जात आहे.

जनरल असीम मुनीर यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याच्या काही दिवस आधीच काश्मीरबाबत एक वक्तव्य केलं होतं.

या विधानामुळं पाकिस्तानच्या लष्करी धोरणावर आणि काश्मीर खोऱ्यात तणाव वाढवण्यामागे पाकिस्तानच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत जनरल असीम मुनीर?

असीम मुनीर यांनी वापरलेले शब्द आणि त्यांचा बोलण्याचा रोख, यावरुन अनेक विश्लेषकांना मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे लष्कर संघर्षाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे वाटते.

जनरल असीम मुनीर यांना पाकिस्तानमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. म्हणजे अशा देशातील एक अशी व्यक्ती, जिथल्या लष्करावर बराच काळ राजकारणात हस्तक्षेप करणे, सरकार बनवणे आणि पाडणे असे आरोप होत आले आहेत.

पहलगामनंतर पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे आणि जनरल असीम मुनीर यांच्याकडे या अण्वस्त्रधारी प्रदेशातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून पाहिलं जात आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे कोण आहेत आणि कोणत्या गोष्टी त्यांच्यावर प्रभाव टाकतात? ते पाहूया.

जनरल असीम मुनीर सुमारे साठ वर्षांचे आहेत. ते एका शाळेचे प्राचार्य आणि धार्मिक विद्वान व्यक्तीचे पुत्र आहेत. 1986 मध्ये ते मंगलामध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानी लष्करात दाखल झाले.

प्रशिक्षणाच्या काळात त्यांची सर्वोत्तम कॅडेट म्हणून निवड झाली होती. ट्रेनिंग स्कूलमधून पदवी मिळवल्यानंतर ते सर्वप्रथम पाकिस्तानच्या 23 फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले होते.

सुमारे चार दशकांच्या लष्करी सेवेत जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानच्या संवेदनशील उत्तरेकडील सीमेवर लष्कराचे नेतृत्व केले.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आंदोलकांनी आसिम मुनीर यांचं पोस्टर जाळलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आंदोलकांनी आसिम मुनीर यांचं पोस्टर जाळलं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचे नेतृत्व केले. यासोबतच त्यांनी सौदी अरेबियासोबत संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी सौदी अरेबियामध्ये कामही केलं.

इस्लामाबाद येथील नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून पब्लिक पॉलिसी आणि स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. याशिवाय त्यांनी जपान आणि मलेशियाच्या लष्करी संस्थांमध्ये देखील शिक्षण घेतलं आहे.

जनरल असीम मुनीर यांची वर्ष 2022 मध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

त्यांनी अशा काळात देशाच्या लष्कराची जबाबदारी स्वीकारली, जेव्हा पाकिस्तान राजकीय आणि आर्थिक संकटातून जात होता. पाकिस्तानची जनता सरकार आणि प्रशासनाशी संबंधित बाबींमध्ये सैन्याच्या कथित हस्तक्षेपामुळे निराश झाली होती.

माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्यातील सार्वजनिक मतभेदांमुळे त्यांची नियुक्ती अनेक महिन्यांच्या चर्चेनंतरच शक्य झाली होती.

जनरल असीम मुनीर हे केवळ आठ महिने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स) प्रमुख होते. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना पदावरून हटवले होते.

जेव्हा त्यांना आयएसआय प्रमुख पदावरून हटवण्यात आलं, तेव्हा अनेक विश्लेषकांनी इम्रान खान यांचं हे पाऊल वैयक्तिक आणि राजकीय असल्याचं मानलं गेलं होतं.

परंतु, दोन्ही बाजूंनी ते नाकारले आहे. आयएसआय प्रमुख पदावरून हटवणं इम्रान खान आणि जनरल मुनीर यांच्यातील नात्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

आज माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत आणि जनरल मुनीर हे पाकिस्तानातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत.

जनरल कमर बाजवा यांच्यापेक्षा वेगळे कसे?

जनरल मुनीर यांची शैली आणि स्वभाव हे पूर्वीचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्यापेक्षा वेगळी आहे, असं अनेक विश्लेषकांचं मत आहे.

जनरल बाजवा सार्वजनिक ठिकाणी अधिक सक्रिय दिसत होते. ते पडद्यामागे भारताशी राजनैतिक संबंधांचे समर्थक होते.

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता, तेव्हा जनरल कमर बाजवा यांनी काळजीपूर्वक परिस्थिती हाताळली होती.

बाजवा यांच्या कार्यपद्धतीला 'बाजवा सिद्धांत' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या सिद्धांतानुसार जनरल बाजवा यांनी प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक अर्थव्यवस्थेसोबतच पारंपारिक सुरक्षा प्राधान्यक्रमांचा पाठपुरावा करण्यावर भर दिला.

वर्ष 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते.

जनरल बाजवा यांनी पाकिस्तानच्या प्रत्युत्तराचे नेतृत्व केले. परंतु, तणाव आणखी वाढू दिला नाही. त्यांनी भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना परत पाठवलं आणि देशाला युद्धात ढकलण्यापासून रोखण्यास मदत केली.

भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेले अब्दुल बासित म्हणाले, "जनरल बाजवा यांनी राजनैतिक मार्ग खुले ठेवले होते. ते काश्मीर व्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि अमेरिकन सैनिकांची माघार यासारख्या अनेक आघाड्या व्यावहारिकपणे हाताळत होते."

अब्दुल बासित प्रतिक्रिया

अब्दुल बासित म्हणतात की, जनरल असीम मुनीर यांच्यावर 'तत्काळ प्रतिक्रिया देण्याचा प्रचंड दबाव आहे'.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "ते अशा वेळी आले आहेत, जेव्हा त्यांना देशाची अंतर्गत सुरक्षा स्थिती मजबूत करण्याचा अपूर्ण अजेंडा पूर्ण करायचा आहे.

त्यांच्यासमोर वाढता कट्टरतावाद, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट आणि क्षेत्रीय तणाव यांसारख्या गंभीर समस्या आहेत. त्यावर त्वरित काम करणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे त्यांच्या आधीचे जनरल बाजवा यांच्याप्रमाणे दीर्घकालिक धोरण तयार करण्यासाठी वेळ नाही."

अब्दुल बासित यांच्या मते, "त्यांना अंतर्गत आणि बाह्य दोन्ही स्तरावरही जलद, वेळेवर आणि कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे."

कमर बाजवा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तत्कालीन पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा.

असीम मुनीर असं का म्हणाले?

विश्लेषक मानतात की, काश्मीर हा असा मुद्दा आहे. ज्यावर कोणत्याही पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाला सौम्य भूमिका दाखवण्याची इच्छा नाही.

राजकीय आणि संरक्षण तज्ज्ञ आमिर झिया म्हणतात, "काश्मीर हा पाकिस्तानसाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. येथील प्रत्येक मूल शाळेत काश्मीरबद्दल शिकतो. काश्मीरच्या बाबतीत पाकिस्तान भारताला कोणतीही सवलत देऊ शकत नाही, असं सर्वसामान्यांचं मत आहे."

पहलगाममध्ये गेल्या आठवड्यात पर्यटकांवर झालेला हल्ला हा गेल्या दोन दशकांतील जम्मू-काश्मीरमधील सामान्य नागरिकांवरील सर्वात मोठा हल्ला आहे.

भारताने याबाबत पाकिस्तानवर आरोप केला आहे. पाकिस्तानने हा आरोप फेटाळला आहे. आता या प्रकरणी भारताकडून लष्करी कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जनरल असीम मुनीर यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून फारशी जाहीर वक्तव्ये केलेली नाहीत. मात्र 17 एप्रिल रोजीच्या त्यांच्या एका भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी प्रवाशांच्या परिषदेत बोलताना जनरल असीम मुनीर म्हणाले होते की, "आपण धर्मापासून ते जीवनशैलीपर्यंत प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत."

पहलगाम हल्ल्यानंतर दल सरोवराचे रक्षण करताना भारतीय सुरक्षा कर्मचारी

फोटो स्रोत, Getty Images

याच भाषणात जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तान काश्मीरच्या लोकांना कधीही एकटे सोडणार नाही, असंही म्हटलं होतं.

पाकिस्तानी नेते यापूर्वीही अशी भाषणे देत आले आहेत आणि पहलगाममध्ये 22 एप्रिलला हल्ला झाला नसता, तर हे भाषणही अशाच प्रकारचे मानले गेले असते.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात दक्षिण आशियाच्या घडामोडींचा मागोवा घेणारे विश्लेषक जोशुआ टी व्हाईट म्हणतात की, "हे सामान्य वक्तव्य नव्हतं. जरी या भाषणाचा विषय पाकिस्तानच्या वैचारीक पद्धतीसारखा असला तरी, त्यातील रोख, विशेषत: हिंदू-मुसलमानांमधील मतभेदांचा थेट उल्लेख करणं, या भाषणाला प्रक्षोभक बनवतं."

ते म्हणतात, "पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी दिलेल्या या भाषणामुळं, पाकिस्तानचा संयम राखण्याचा दावा आणि पडद्यामागील मुत्सद्दीपणाच्या प्रयत्नांमधी गांभीर्य यातील गुंतागुंत वाढवली आहे."

अब्दुल बासित यांचंही मत आहे की, या विधानाकडे ज्या पद्धतीने पाहिलं गेलं ते हानिकारक ठरू शकतं.

ते म्हणतात, "कदाचित असीम मुनीर त्या क्षणी भारावून गेले असावेत. खासगीत काही गोष्टी स्वीकारल्या गेल्या असतील पण सार्वजनिक व्यासपीठावर लष्करप्रमुख या नात्यानं त्या स्पष्टपणे संघर्षाच्या वाटत होत्या."

अब्दुल बासित म्हणतात, "काही लोकांना असं वाटलं की, हे वक्तव्य म्हणजे शक्ती प्रदर्शन होतं. जणू काही ते असे जाहीर करत आहेत की, सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात आहे आणि पाकिस्तानची जबाबदारी पुन्हा एकदा लष्कराच्या हाती आहे."

मुनीर यांचं भाषण आणि पहलगाम हल्ला

या वर्षाच्या सुरुवातीलाही जनरल असीम मुनीर यांनी भाषण केलं होतं. त्यामुळं काही लोकांना असं वाटलं होतं की, जनरल मुनीर हे त्यांच्या आधीच्या लष्करप्रमुखांपेक्षा कठोर भूमिका स्वीकारतील.

5 फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिनानिमित्त मुझफ्फराबादमध्ये बोलताना ते म्हणाले होते, "पाकिस्तानने काश्मीरसाठी यापूर्वी तीन युद्धे लढली आहेत आणि गरज पडल्यास आणखी दहा युद्ध लढण्यास तयार आहे."

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी हल्ला आणि जनरल असीम मुनीर यांच्या भाषणातील कथित संबंधाकडे लक्ष वेधले. या विधानामुळे दोन्ही देशांमधील आधीच अस्तित्वात असलेला अविश्वास आणखी वाढला आहे.

पाकिस्तानमध्ये जनरल असीम मुनीर यांच्याकडे विचारपूर्वक पावलं उचलणारी आणि तडजोड न करणारी व्यक्ती म्हणून पाहिलं जातं.

9 मे 2023 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशात गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा जनरल असीम मुनीर यांनी इम्रान खान यांच्या समर्थकांवर कडक कारवाई सुरू केली होती.

त्यानंतर सामान्य नागरिकांवर लष्करी कायद्यांतर्गत खटले सुरू झाले. पाकिस्तानी लष्करातील एका उच्चपदस्थ जनरलला अकाली निवृत्त करण्यात आले.

जनरल असीम मुनीर काश्मीरबद्दल भाषण करताना.

फोटो स्रोत, YouTube/@ISPR

इम्रान खान यांच्या जवळचे मानले जाणारे आयएसआयचे माजी प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना अटक करण्यात आली.

समीक्षकांनी याला इम्रान खान यांच्या समर्थकांवरील कारवाई म्हटलं. परंतु समर्थकांनी सांगितलं की, जनरल बाजवा आणि जनरल मुनीर या दोघांच्यावर वाढत्या सार्वजनिक टीकेमुळे ताणलेली लष्करी सुव्यवस्था पुन्हा स्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे.

जनरल असीम मुनीर यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण केली आहेत. पण त्यांच्या कामाची रूपरेषा तयार होऊ लागली आहे.

भारतासोबतचा सध्याचा तणाव लष्करी संघर्षात बदलेल किंवा मुत्सद्दी मार्गाने सोडवला जाईल. परंतु, जनरल मुनीर यांना कोणत्या दिशेने ते न्यायचं आहे यावर पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध ठरवले जातील.

पुढील काही आठवडे निर्णायक ठरतील, असं अब्दुल बासित यांना वाटतं.

अब्दुल बासित म्हणतात, "जनरल असीम मुनीर या संकटाला कसं तोंड देतात, यावर त्यांचा एक सैनिक, एक पॉवर ब्रोकर म्हणून रोल आणि प्रदेशातील पाकिस्तानाची भूमिका निर्धारित होईल. सध्या हा निर्णय त्यांच्याच हातात आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)