सयाजीराव गायकवाड : 'ज्याचं अमेरिका केवळ स्वप्न पाहू शकली, ते बडोद्यानं करुन दाखवलं'

- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Twitter,
इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी 1913 मध्ये मराठी प्रतिभासंपन्न व्यक्तींची एक यादी केली होती. त्यांनी ती तीन टप्प्यांमध्ये केली होती. पहिल्या यादीत दीडशे कर्तबगार व्यक्ती, ज्यात काही राजस्त्रियाही होत्या, व्यक्तींची नावं होती.
मग दुसऱ्या टप्प्यात त्यात 43 नावंच राहिली. जेव्हा राजवाड्यांनी अंतिम सात जणांची नावं जाहीर केली त्यात शेवटपर्यंत अग्रणी राहिलेलं नाव म्हणजे बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड.
डॉ. सदानंद मोरेंनी त्यांच्या 'गर्जा महाराष्ट्र' या पुस्तकात राजवड्यांच्या या यादीविषयी विस्तारानं लिहिलं आहे. राजवाड्यांची भूमिका, त्यांचे समज, त्यांनी नावं निवडतांना लावलेले निकष याबद्दल सर्व बाजूंनी चर्चा करता येईल, हा भाग अलहिदा. पण त्यातल्या सयाजीरावांच्या स्थानाबद्दल त्या काळात, अथवा आज, कोणालाही शंका असणार नाही. ते शक्यही नाही.
"पौराणिक धाटणीनं या सात जणांना महाराष्ट्राच्या आकाशातील सप्तर्षी असे म्हटले. हीच उपमा आणखी पुढे न्यायची म्हटले, तर या सातांपैकी सहा ब्रम्हर्षी आणि एक राजर्षी अशी विभागणी करावी लागते. बडोदा संस्थानचे अधिपती महाराज सयाजीराव गायकवाड हे ते राजर्षी होत.”
“सर्व महाराष्ट्रास अभिमान वाटावा असे जे महापुरुष ब्रिटिश अमदानीत होऊन गेले, त्यात सयाजीरावांचे नाव ठळक अक्षरात लिहावे लागते. महाराजांनी स्वत:च्या बडोदा संस्थानात घडवून आणलेल्या सुधारणांची भारतातील अन्य कोणता संस्थानिक बरोबरी करू शकेल, असे वाटत नाही," असं मोरे त्यांच्या पुस्तकात लिहितात.
सयाजीरावांचा सलग 60 वर्षांचा कारभार संपून, 1939 मध्ये त्यांचं निधन होऊन आणि संस्थानिकांची राज्यं जाऊन भारतात संसदीय लोकशाही येऊन इतकी वर्षं उलटली, पण सयाजीरावांच्या द्रष्टेपणाचा परिणाम ओसरत नाही.
आजही आदर्श लोकाभिमुख राज्यकारभार कसा असावा यासाठी राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वाला सयाजीरावांचं, त्यांच्या निर्णयांचं आणि उपक्रमांचं उदाहरण समोर घ्यावं लागतं. सयाजीरावांनी काय केलं नाही? त्यांचं नाव भारतीय इतिहासात अनेक बाबतींसाठी अग्रक्रमानं घेतलं जातं.
सध्याच्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या बडोदा संस्थानाचं साम्राज्य त्यांनी 60 वर्षं सांभाळलं.
प्रशासनापासून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सुधारणा, उद्योग, अर्थकारण, स्थापत्यशास्त्र या अनेक क्षेत्रांमध्ये ज्या द्रष्टेपणानं त्यांनी स्वत:चा अमीट ठसा उमटवला, त्याचा उल्लेख आधुनिक काळात वारंवार येत राहतो.
सर्वांना शिक्षण अनिवार्य करण्यापासून ते शाळा-महाविद्यालयं उभारण्यापर्यंत, रेल्वेचं तंत्रज्ञान आणून तिचं जाळं आपल्या राज्यात उभारण्यापासून ते बँक सुरू करण्यापर्यंत, सुधारकांच्या मागे खंबीर उभे राहण्यापासून ते ब्रिटिशांची नजर चुकवून स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांना मदत करण्यापर्यंत, सयाजीरावांचं कर्तृत्व बहुआयामी होतं.
त्यांच्या प्रत्येक कामावर विस्तारानं लिहिलं गेलंय आणि अजूनही लिहिता येईल.

फोटो स्रोत, sharad badhe
पण राज्यकर्त्याला द्रष्टा तेव्हा म्हटलं जातं जेव्हा अद्याप जिथं कोणाची नजर वा कल्पना पोहोचली नाही आहे, तिथं पोहोचणारे ते पहिले असतात.
सयाजीराव तसे होते आणि ते कसे समजून घेण्यासाठी त्यांच्या अनेक असंख्य पथदर्शी कामांमधलं एक काम, ग्रंथालयांची चळवळ, समजून घ्यावी लागेल.
अनेकांना कदाचित माहित नसेल की, महाराजा सयाजीरावांना सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते असंही म्हटलं जातं. ती बडोद्यात सुरू झाली, देशभर पसरली.
स्वत: कधी शाळेत गेले नाहीत, पण...
हे सर्वांनाच माहीत आहे की सयाजीराव हे बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यात दत्तक म्हणून आले. तेव्हा ते 12 वर्षांचे होते. मूळचे मालेगावजवळच्या कळवणचे 'गोपाळराव', 1875 मध्ये दत्तकविधानानंतर 'सयाजीराव (तृतीय)' झाले. पण ते लगेचच ते गादीवर आले नाहीत. 1881 मध्ये त्यांच्याकडे राज्याधिकार आले.
दत्तक घेण्यासाठी त्यांची निवडपरीक्षाच घेण्यात आली होती. या प्रक्रियेत ब्रिटिश अधिकाऱ्यांचाही समावेश होता. असं म्हणतात की त्यावेळेस 'तुम्ही इथं का आला आहात' असं विचारलं गेलं तेव्हा छोट्या गोपाळरावांनी 'राजा होण्यास आलो' असं हजरजबाबी उत्तर दिलं होतं. तसे ते झालेही आणि 'सयाजीराव' झाल्यावरही राजा म्हणून प्रजेला आधुनिक नेतृत्वही त्यांनी दिलं. त्यातलं सगळ्यात महत्वाचं होतं शैक्षणिक कार्य.
"सयाजीराव गायकवाडांना ते बारा वर्षांचे असतांना दत्तक घेण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना 27 मे 1875 रोजी दत्तक घेण्यात आलं, त्या दिवसापर्यंत त्यांना मातृभाषेतून सही करता येत नव्हती. ते कधी शाळेत गेले नव्हते. दत्तक आल्यानंतर जेव्हा त्यांचं शिक्षण सुरू झालं तेव्हा याची शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव झाली.
याच दरम्यान त्यांच्या मनात हाही विचार आला की जर राजघराण्यातल्या कोणाला लिहिता वाचता येत नसेल तर असं वाटतं, तर जी सामान्य प्रजा आहे, त्यांना काय वाटत असेल. तेव्हाच त्यांनी ठरवलं की असं काही करायला हवं की सगळ्यांना शिक्षण आणि त्याची साधनं मिळायला हवीत," राजेंद्र शाह सांगतात. राजेंद्र शाह हे बडोद्याच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि सध्या 'बडोदा हेरिटेज सेल'चे विशेषाधिकारीही आहेत.

शिक्षणाच्या क्षेत्रात काही आमूलाग्र करण्याचे प्रयत्न सयाजीरावांच्या कारकीर्दीत अगदी पहिल्यापासून दिसतात. शाह म्हणतात तसं त्याची प्रेरणा स्वत:च्या आयुष्याच्या अनुभवांतून आली होती आणि ती शेवटपर्यंत वाढत गेली.
मुलं आणि मुलींना त्यांनी शालेय शिक्षण अनिवार्य केलं. त्यासाठी गावागावांमध्ये शाळा सुरू केल्या. विद्यापीठ उभं राहिलं. इथं नोंद करता येईल की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले तेव्हा त्यांना सयाजीरावांनी मदत केली होती. ही शिक्षणासाठीची तळमळ होती.
याच शिक्षण विचाराची व्युत्पत्ती म्हणजे ग्रंथालय चळवळ. शाळा-विद्यापीठांमध्ये शिक्षण मिळेलच, पण समाज ज्ञानाभिमुख हवा असेल तर वाचन हवं. त्यासाठी ग्रंथालयं हवीत. केवळ विद्यार्थी, संशोधनासाठी नव्हेत, तर सार्वजनिक हवीत. जिथं सामान्य लोक येऊनही पुस्तक घेऊन वाचू शकतील. ते प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी धोरण हवं.
"त्यांनी सगळ्यांना शिक्षण पहिल्यांदा मुलामुलींसाठी अनिवार्य केलं. मुलींचं शिक्षण अनिवार्य केलं. म्हणजे लोकांना अक्षरं लिहिता-वाचता येऊ लागली. त्यांना वाक्यं वाचता येऊ लागली. त्यामुळे आपोआपचं दुसरं कोणतंही लक्ष विचलित होण्याचं कारण नव्हतं. त्यामुळं अधिकाधिक लोक वाचू लागले. अशा प्रकारे लायब्ररी मूव्हमेंटचा वेग वाढत गेला. त्यांनी ते अनिवार्यच केलं की गावामध्ये तलाठीचा चौराहा, शाळा आणि ग्रंथालय असलंच पाहिजे," जितेंद्र गायकवाड आम्हाला सांगतात.
जितेंद्र म्हणजे स्वत: बडोद्याचा चालताबोलता इतिहास आहेत. ते स्वत: गायकवाड घराण्याचे वंशज आहेत. त्यांनी इथला इतिहास जपण्यासाठी, तो सगळ्यांना सांगण्यासाठी स्वत:ला अक्षरश: झोकून दिलं आहे.
बडोदा सेंट्रल लायब्ररी
बडोदा आधुनिक शहर झालं असलं तरी सयाजीरावांच्या काळातल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली या शहरानं आजही जपली आहे. त्यामुळे शहरातून फिरतांना जुन्या इमारतींच्या सानिध्यात काळ वेगानं मागे गेल्यासारखं वाटतं. अनेक इमारतींमध्ये न्यायमंदिराची एक जुनी इमारत तलावाजवळ उभी आहे. त्यासमोरुन जुन्या शहरात सरळ जाणारा वर्दळीचा रस्ता घेऊन जातो 'बडोदा सेंट्रल लायब्ररी'मध्ये.
बडोदा शहराच्या मध्यभागी उभी असलेली ही शतकभराहून जुनी इमारत. लाखो पुस्तकं, शेकडो दुर्मिळ हस्तलिखितं आजही इतक्या वर्षांनंतर जपणारं हे ज्ञानाचं केंद्र. ग्रंथालय चळवळीचंही केंद्र या इमारतीला म्हणता येईल. 1910 मध्ये उभारण्यास सुरुवात झालेलं हे ग्रंथालय 1930 मध्ये पूर्णत्वास गेलं.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ही वास्तू आहे. बाहेर रस्त्यावरुन कदाचित कल्पना येणार नाही की आत या इमारतीचा विस्तार किती आहे. पण छोट्या पाय-यांवरुन आत गेल्यावर अवघ्या काही क्षणांमध्ये ती येते. ही पुराणवास्तू आहे. इथलं फर्निचर, टेबल्स, कपाटं, खुर्च्या सगळ्या गोष्टी शतकभर मागे घेऊन जातात.

फोटो स्रोत, sharad badhe
मोकळा काही भाग सोडला की आता सलग पुस्तकांची दोन्ही बाजूला कपाटं सुरु होतात. हजारो पुस्तकं. बहुतांश इंग्रजी आणि गुजराती.
मध्येच काही कपाटं मराठी पुस्तकांची दिसतात. तो पसारा पाहता पाहता लक्ष वर जातं तर काचेचं छत असतं. पण चक्रावायला होतं की ते छत नाही तर तो मजला आहे. असेच दोन मजले वर आहेत. एकूण तीन. त्यावर सगळी पुस्तकंच पुस्तकं.
त्यानंतर पाहता पाहता अचानक समजतं की इथं वीजेचे दिवे लावले नाही आहेत. पण तरीही या सगळ्या पुस्तकगल्ल्यांमध्ये भरपूर प्रकाश आहे. खालच्या तिसऱ्या मजल्यावरही प्रकाश आहे, अंधार झालेला नाही. त्याचं कारण समजतं की वरुन छतापासून झिरपलेला प्रकाश प्रत्येक मजल्याच्या या काचेच्या फ्लोअरिंगमधून झिरपत खाली शेवटापर्यंत पोहोचला आहे. प्रकाशाचा हा खेळ जाणीवपूर्वक वाचनासाठी करण्यात आला आहे.
ही इमारत सुरू होण्यापूर्वी समोरच्या सरकारवाड्यात ही सेंट्रल लायब्ररी होती. नंतर ही बांधण्यात आली. या ग्रंथालयात आजही स्वत: सयाजीरावांनी स्वत:च्या संग्रहातून दिलेली 30 हजार पुस्तकं आहेत, ज्यांच्यापासून या ग्रंथालयाची सुरुवात झाली. मग दिवसागणित त्यात पुस्तकांची भर पडतच गेली.
आजमितीला इथं दोन लाखांच्या आसपास पुस्तकं आहेत. बडोदा संस्थान राहिलं नाही, पण त्यानंतर गुजरात सरकारच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे हे ग्रंथालय आणि त्याच्यासोबत चळवळीच्या काळात उभारल्या गेलेली दीड जवळपास 1200 ग्रंथालयं आजही चालवली जातात.
हजारो विद्यार्थी या ग्रंथालयाला जोडले गेले. आणि केवळ या एकाच ग्रंथालयाला नव्हे, तर चळवळीतून तयार झालेल्या हजारो ग्रंथालयांच्या जाळ्याला. सेंट्रल लायब्ररी ही ग्रंथालयाची चळवळ करु पाहणा-या महाराजांसाठी एक स्वप्न होती. इथं केवळ पुस्तकंच आली नाहीत, तर इथं एक पद्धती तयार झाली जी इथून राज्यात सर्वत्र पसरली. पण अशा ग्रंथालयाची कल्पना सयाजीरावांच्या मनात रुजली जेव्हा त्यांचा परदेश प्रवास सुरू झाला.

फोटो स्रोत, sharad badhe
"जेव्हा अठराव्या वर्षी ते सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा त्यांचा देशाविदेशात प्रवास सुरू झाला. अशाच एका प्रवासात ते अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात गेले आणि तिथलं ग्रंथालय त्यांनी पाहिलं. तेव्हा त्यांनाही आपल्याकडे अशी लायब्ररी असावी असं वाटलं," राजेंद्र शाह सांगतात.
"पुस्तकांना कसं कपाटांमध्ये ठेवलं जातं, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं, ती वाचकांना कशी द्यायची, नोंदी कशा ठेवायच्या, ती जतन कशी करायची, त्यांचं वाळवीपासून संरक्षण कसं करायचं हे सगळं शास्त्र त्यांनी तिथं पाहिलं. कोलंबियामध्ये विल्यम बॉर्डन नावाचे ग्रंथपाल होते. त्यांना सयाजीरावांनी बडोद्याला आणलं. त्यांना सांगितलं की इथं कोलंबियासारखी लायब्ररी सुरू करा. त्यामुळे असं म्हणतात येईल की इथं जी चळवळ सयाजीरावांनी सुरू केली त्यामागे परदेश प्रवासात त्यांनी जे पाहिलं, त्याची प्रेरणा होती," शाह पुढे सांगतात.
या कोलंबियाहून आलेल्या विल्यम बॉर्डन यांनी बडोदा सेंट्रल लायब्ररी उभारली. 'बडोदा लायब्ररी मूव्हमेंट' मध्ये त्यांचं महत्व मोठं आहे. असंही सांगितलं जातं की या मध्यवर्ती ग्रंथालयाची रचना करण्यासाठी ज्यांनी नवी दिल्लीची रचना केली त्या एडविन ल्यूटेन यांचीही मदत घेण्यात आली.
"तुम्ही या ग्रंथालयाचं ग्लास फ्लोअरिंग बघा. जेव्हा वीज नव्हती, ए.सी. नसल्याचं नैसर्गिक व्हेंटिलेशनच होतं, तेव्हा जर तुम्ही उघड्यावर रिडिंग रुममध्ये बसणार असाल तर तुम्हाला एवढा कम्फर्ट आहे. तुम्ही इथल्या फर्निचरची क्वालिटी पाहा. इथल्या खास तयार केलेल्या खुर्च्या पहा. पुरुष आणि स्त्रियांच्या त्यांना सोयीच्या शरीररचनेप्रमाणं त्या तयार केल्या आहेत. त्यांनी रिडिंग टेबल्स, नोट टेकिंग टेबल्स वेगळे ठेवले. काय नाही केलं सयाजीरावांनी?,' जितेंद्र गायकवाड विचारतात.
1930 मध्ये पूर्णपणे सुरू झालेली ही लायब्ररी आजही अव्याहतपणे सुरू आहे. खंड नाही.
'ज्याचं अमेरिका केवळ स्वप्न पाहू शकली, बडोद्यानं करुन दाखवलं'
अमेरिकेतून आलेल्या विल्यम बॉर्डन यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती ग्रंथालय तर उभारलं गेलं आणि सुरू झालं. पण त्यांचं योगदान या चळवळीत एवढंच नाही. ही चळवळ जर पुढे चालू ठेवायची असेल तर ग्रंथालयाचं व्यवस्थापन जाणणारे ग्रंथपाल हवेत. त्यानं पुढची पिढी तयार होईल. त्यांनी तसे प्रयत्न केले.
"विल्यम बॉर्डन तीन वर्षांच्या करारावर बडोद्याला आले होते. त्यानंतर ते अमेरिकेला परत जाणार होते. पॅलेसमध्ये जे ग्रंथपाल तेव्हा होते, जी एस कुडाळकर, त्यांना बरोबर घेतलं आणि लायब्ररीचं जे सगळं व्यवस्थापनाचं काम होतं ते त्यांना समजावून सांगितलं.
"कुडाळकरांनी एक कार्य केलं ते म्हणजे या सेंट्रल लायब्ररीत एक हॉल आहे, तिथं लायब्ररी सायन्सचा कोर्स सुरू केला. तिथं 25 रुपये स्टायपंड देऊन विद्यार्थ्यांना बोलावलं आणि ग्रंथपाल तयार केले. गावांमध्ये, तालुक्यांमध्ये जी ग्रंथालयं होती, तिथं ग्रंथपाल नियुक्त केले गेले," भावेश लोंढे सांगतात. भावेश या मधवर्ती ग्रंथालयात व्यवस्थापक आहेत. त्यांची इथे तिसरी पिढी आहे. त्यांचे आजोबा आणि वडील हेसुद्धा इथं या ग्रंथालयात होते.
विल्यम बॉर्डन यांनी 1913 मध्ये बडोद्याच्या ग्रंथालय चळवळीबद्दल काय म्हटलं होतं ते या चळवळीत एक महत्वाचं नाव असलेल्या न्यूटन मोहन दत्त यांनी त्यांच्या 'बरोडा एंड इट्स लायब्ररीज' या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. बोर्डन म्हणतात:
"मी बडोद्यात ते करायचा प्रयत्न केला जे अमेरिकेनं करण्याचं उद्देश्य ठरवलं होतं, पण ते करू शकले नव्हते. जर या एवढ्या मोठ्या राज्यात पसरणाऱ्या ग्रंथालय चळवळीला काही महत्त्व असेलच तर याची नोंद घेतली जावी की ती भारतात प्रत्यक्षात आली आणि तिथे नव्हे (अमेरिकेत) जी आधुनिक ग्रंथालय चळावळीची मातृभूमी आहे. ज्याचं अमेरिका केवळ स्वप्नं पाहू शकली, ते बडोद्यानं करुन दाखवलं."

सयाजीरावांनी गावांमध्ये उभारलेली ग्रंथालयं आजही सुरू आहेत
महाराज सयाजीरावांची इच्छा होती की सगळ्यांनी वाचायला हवं. म्हणून सार्वजनिक ग्रंथालयं झाली, केवळ विद्यार्थ्यांची नव्हे. जिथं पुस्तकं नसतील तिथं पोहोचवली जातील त्यासाठी फिरती लायब्ररी आली. ज्यांना वाचता येत नाही, त्यांना वाचण्यासाठी मदत केली जाईल.
"एखाद्या गावाची वस्ती, लोकसंख्या किती आहे ते पाहून तिथं शाळा, ग्रंथालयं स्थापन केली. पण जी गावं दुर्गम भागात आहेत, जिथं शंभरएक लोक राहतात, तिथं काय करायचं? मग ठरलं की इकडून तिकडे पुस्तकं पाठवायचं ठरलं. म्हणजे फिरती लायब्ररी. बैलगाडीमध्ये पुस्तकं ठेवायची आणि त्या गावात जी सुशिक्षित व्यक्ती आहे तिच्या घरी ती पुस्तकं ठेवायची. काही गावं अशी होती की तिथं साक्षरता नाही, कोणी शिकलेलंच नाही, तिथं काय करायचं? मग तिथं व्हिडिओ व्हिज्युअल सिस्टिम, ज्याला आपण आज प्रोजेक्टर म्हणतो, ती त्यांनी मागवली. पडद्यावर पिक्चर्स दाखवायला लागले," भावेश लोंढे सांगतात.
फिरती ग्रंथालय सुरू तर केली. त्या काळाची ती गरजही होती. पण त्यात कमाल ही आहे की आजही सयाजीरावांनी सुरू केलेली ही कायमस्वरूपी आणि फिरती ग्रंथालयंही सुरू आहेत. गुजरात सरकारनं ती चालू ठेवली आहेत.

"तेव्हा ज्या गावांमध्ये ग्रंथालयं सुरू झाली, त्यातल्या 1200 गावांमध्ये आम्ही अजून ती सुरु ठेवली आहेत. त्यांना आम्ही गुजरात सरकार दरवर्षी 15000 रुपये अनुदान देतं. जी फिरती पुस्तकालयं होती, त्या 85 दुर्गम केंद्रांमध्ये अजूनही ते सुरू आहे. तिथे आठवड्यातून आमची गाडी एकदा पुस्तकं घेऊन जाते," लोंढे सांगतात.
सयाजीरावांची गावागावांतून सुरू केलेली ग्रंथालयाची चळवळ आजही कशी टिकून आहे ते पहायला आम्ही बडोद्यापासून 30 किलोमीटरच्या या भादराण गावात गेलो. 1930 साली इथं हे ग्रंथालय उभं करण्यात आलं आहे. जुनी दगडी इमारत आहे. तेव्हापासून वाचनात खंड नाही. स्थापनेवेळेस दिलेली काही पुस्तकं आम्हाला इथे दिसतात. त्यातली काही मराठीही आहेत. चिमणभाई पारेख 1964 पासून लायब्ररीचं काम पाहतात. ते सगळी पुस्तकं, जुनी जपून ठेवलेली, आग्रहानं आम्हाला दाखवतात. आजही लोक सकाळ-संध्याकाळ इथं येऊन पुस्तकं घेऊन जातात किंवा वाचतात. पण आता मोबाईलमुळं तरुण मुलं कमी वाचायला येतात, हे त्यांच्या वयस्क नजरेतून सुटलं नाही आहे.
"पढने के लिए अब कोई नही आता. दो-तीन लोग आते है बस. शाम को कुछ लोग आते है. मोबाईल आ गया है ना. नौजवानोंको पुस्तकों की कुछ पडी है. पढने का समय ही नही है. मोबाईल मे सब है, समाचार है सब है. पहले तो यहां पचास-पचास आदमी आते थे. बैठने की जगह नही मिलती थी," चिमणभाई त्यांच्या गुजरातीमिश्रित हिंदीमध्ये आम्हाला सांगतात.

याच भादराणच्या ग्रंथालयात आम्हाला जुनं मराठी पुस्तक सापडलं. पुण्यात प्रकाशित झालेला सयाजीरावांच्या निवडक भाषणांचा तो संग्रह होता. त्यात 7 नोव्हेंबर 1912 रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी केलेलं भाषण आहे. त्यात सयाजीराव त्यांच्या ग्रंथालय चळवळीच्या हेतूबद्दल सांगतात.
ते म्हणतात: 'ग्रंथालये स्थापन करण्याच्या हेतू हा की मानवी कृत्ये आणि विचार यांची नोंद चिरकालिक व्हावी, कारण ती नोंद पुढील पिढ्यांना बोधप्रद आणि मार्गदर्शक असते. पुढील पिढ्यांपैकी जी मंडळी विश्वकार्याला थोडाफार हातभार लावणार असतील, मनुष्यजातीच्या बुद्धीची, संस्कृतीची आणि बलाची प्रगती करण्यात अंशभाक् होणार असतील, त्यांनी मागी शेकडो पिढ्यांच्या कामगिरीच्या पायावरच आपल्या कार्याची उभारणी केलेली बरी."

वाचक आणि विचारी राजा
सयाजीराव स्वत: उत्तर वाचक होते. त्यांना स्वत:ला पुस्तकं वाचण्याची सवय होती आणि दिवसातला ठराविक वेळ त्यासाठी आरक्षित असे. ते विचारी राजा होते आणि म्हणून वाचनाचा हा व्यासंग केवळ स्वत:पुरता न ठेवता तो सगळ्या राज्याचा त्यांनी केला. धोरणीपणा, मुत्सद्दीपणा या अशा विचारी वाचनातून येतो.
"बडोदा स्टेटचे 64 राजवाडे होते. प्रत्येक राजवाड्यात रिडिंग रुम होती. प्रत्येक राजवाड्यात लायब्ररी होती. त्या लायब्ररीला त्या भागातल्या शाळा आणि महाविद्यालयांशी जोडलेलं असायचं. म्हणजे त्या भागातले विद्यार्थी तिथं येऊन पुस्तकांचा वापर करु शकायचे. ती नुसतीच धूळ झात पडली नव्हती. लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये तर 3 लाख पुस्तकं होती. मी स्वत: ती पाहिली आहे जी भुयारामध्ये असायची," जितेंद्र गायकवाड सांगतात.
सयाजीरावांची ही ग्रंथालय चळवळ केवळ बडोद्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. बडोद्याबाहेर त्यांनी जवळपास 200 ग्रंथालयं उभारली वा त्यांना मदत केली. बनारस हिंदू विद्यापीठाचं ग्रंथालय तर त्यांच्या नावानं आहे.
"त्यांनी केवळ लायब्ररीच सुरू केली नाही तर त्यातल्या पुस्तकांचं प्रिंटिंगही सुरू केलं. म्हणजे सरकारी प्रेस सुरू केली. त्यांचं म्हणणं असं होती की जगभरात जी काही चांगली पुस्तकं आहेत ती बडोद्यात छापणं सुरू झालं. जगभरातल्या विविध भाषांमधल्या पुस्तकांना मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजीमध्ये भाषांतरित केलं जाऊ लागलं. ग्रंथालय चळवळ पसरावी इतर सर्वत्र ती पुस्तकं देऊ लागले. 'सयाजी साहित्यमाला' या नावानं त्यांनी हे प्रकाशित केलं. साहित्यमाला म्हणजे विविध भाषांतली पुस्तकं प्रकाशित करणं आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं," बडोद्याचेच इतिहास अभ्यासक चंद्रशेखर पाटील सांगतात.
"ग्रंथालय चळवळीला त्यांनी अशी चालना दिली की 1881 मध्ये संपूर्ण बडोदा संस्थानात केवळ 1 ग्रंथालय होतं. पण 1939 मध्ये जेव्हा सयाजीराव महाराजांचं निधन झालं तेव्हा संपूर्ण राज्यात 1504 ग्रंथालयं होती. मुलं शिकायला लागली होती, त्यामुळं शाळांची संख्याही वाढली. 1881 मध्ये बडोदा संस्थानात 204 शाळा होत्या. 1939 मध्ये संस्थानात 2414 शाळा सुरू झाल्या होत्या. शिक्षणाच्या क्षेत्रात एक माणूस काय करु शकतो हे या आकड्यांमुळे समजेल," राजेंद्र शाह सांगतात.
सयाजीरावाचं ग्रंथालय धोरण त्यांच्या पश्चात आलेल्या लोकशाहीतल्या निर्वाचित शासनकर्त्यांनीही उचललं आणि आजही चालू ठेवलं. लोकोत्तर राज्यकर्ता तो असतो ज्याचा प्रभाव येणाऱ्या असंख्य पिढ्यांवर पडत राहतो. ग्रंथालयांची चळवळ उभारणारे महाराजा सयाजीराव गायकवाड तसे होते.