'मी ज्ञानाचा सागर उपसताना,तू मात्र माझा संसार शिवत आहेस', गोष्ट बाबासाहेबांच्या 'रामू'ची

फोटो स्रोत, Other
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. यावेळी मला इतर कशाचे भान नाही, पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून... माझं मनोबल वाढवीत आहेस, म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.
रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर ? तर काय झालं असतं"या वस्तीत असलेल्या वेश्यालयाला रोषणाई नाही किंवा रस्त्यावर 'गिऱ्हाईक' घेऊन येण्यासाठी कोणी दलालही दिसत नाही. " loading="lazy" style="aspect-ratio:1132 / 637" class="bbc-139onq"/>
End of सर्वाधिक वाचलेले
पण असं असलं तरी इतिहासामध्ये मात्र रमाईंबद्दल फारच त्रोटक लिखाण झालं आहे. किंबहुना रमाईंवर हा अन्याय केला असल्याचं 'बाबांची रामू' या पुस्तकाचे लेखक ज.वि. पवार सांगतात.
रमाईंच्या जन्मतारखेबद्दल काहीही माहिती नसताना अत्यंत परिश्रमाने त्यांची जन्मतारीख शोधून काढल्याचं ज.वि.पवार म्हणाले.
रमाईंची आज (7 फेब्रुवारी) जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्तानं आंबेडकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहत, त्यांना संसाराच्या कटकटींपासून दूर ठेवत, त्यांना ध्येयप्राप्तीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या रमाईंबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
बाबासाहेबांची 'रामू' ते आंबेडकरी जनतेची रमाई
इतिहासात डोकावून पाहिलं असता रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत मोजकी माहिती उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामागचं कारण सांगताना लेखक ज.वि. पवार यांनी त्याकाळची मानसिकता याला कारणीभूत असल्याचं म्हणाले.


"त्याकाळची हिंदू मानसिकता आणि पुरुषी अहंकारामुळे महिलांना फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. महिला त्यावेळी अभावग्रस्त असायच्या. त्यामुळं महिलांना फार महत्त्व न देण्याच्या मानसिकतेमुळंचं रमाईंना अनुल्लेखानं मारलं.
बाबासाहेबांचं चरित्र लिहितानाही लेखकांकडून त्यात रमाईंचा आवश्यक तेवढा उल्लेख करण्यात आला नाही," असं पवार यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, J.V.Pawar
पण बाबासाहेबांच्या जीवनात मात्र रमाईंचं अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. रमाईंना ते प्रेमानं 'रामू' म्हणत. त्यांच्या पत्रांमध्येही ते रमाईंना रामूच म्हणायचे.
पण इतिहासात फारसं लिखाण झालं नसलं तरी बाबासाहेब आणि रमाईंच्या पत्राद्वारे झालेल्या संवादाच्या माध्यमातून मात्र बरंच काही स्पष्ट झालं. रमाईंचं बाबासाहेबांच्या जीवनात किती महत्त्वं होतं, हे त्यामुळंच समजू शकलं.
त्यामुळंच बाबासाहेबांनी कोट्यवधी अनुयायांना शिक्षणाची प्रेरणा दिली असली तरी त्यांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या रमाबाई या पुढे आंबेडकरी जनतेच्याच नव्हे तर अवघ्या म्हाराष्ट्राच्या रमाई बनल्या.
जन्मापासून वाट्याला आला संघर्ष
महाराष्ट्राच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या वणंद या एका अगदी लहानशा खेड्यामध्ये भिकू आणि रुख्मिणी या दाम्पत्याच्या पोटी रमाबाईंचा जन्म झाला.
7 फेब्रुवारी 1897 ही रमाबाईंची जन्मतारीख. आंबेडकरी इतिहासाचे अभ्यासक लेखक ज.वि. पवार यांनी ही तारीख शोधण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागल्याचं सांगितलं.
"कुठल्याही नोंदींमध्ये ही तारीख उपलब्ध नव्हती. पण रमाबाईंचे मामा गोविंद पूरकर यांच्या जुन्या कागदपत्रात बोरूने जाड्या अक्षरांत लिहिलेली जन्म तारीख मिळाली. त्यात भागिरथीचा विवाह असा उल्लेख होता. लग्नाच्या आधी रमाबाईंना भागिरथीही म्हणायचे," असं पवार यांनी सांगितलं.
अत्यंत हलाखीचे जीवन जगत असतानाच रमाबाई अवघ्या 8 वर्षांच्या असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या मामा आणि काकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना त्यांच्यासोबत मुंबईला आणलं.

त्याकाळी कमी वयामध्ये लग्नं व्हायची. त्यामुळं घरामध्ये रमाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. बाबासाहेबांचे वडील रामजीराव यांनी रमाला पसंती दाखवली आणि विवाह नक्की केला. त्यावेळी बाबासाहेब नवव्या वर्गात शिकत होते.
बाबासाहेबांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रमाच त्यांच्यासाठी योग्य असेल, असा सुभेदार रामजीराव यांना विश्वास होता. त्यामुळंच त्यांनी हा निर्णय घेतला होता. रमाईंनीही पुढं तो विश्वास सार्थ करून दाखवला.
रमाला आईनं लहानपणापासून घरकामं शिकवली होती. त्यामुळं त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आणि नव्या कुटुंबामध्ये रमत त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात झाली.
बाबासाहेबांनी आग्रहाने शिकवले
रमाबाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा संसार सुरू झाला होता. सासरी रमा पूर्णपणे रमल्या होत्या. सासरच्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमानं त्यांच्या जीवनातली कसर भरून निघाली होती.
पण बाबासाहेबांना रमाबाईंना शिकवायची इच्छा होती. प्रत्येकानं शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे, हे बाबासाहेबांना उमगलेलं होतं. त्यामुळंच आपल्या पत्नीनंही शिकायला हवं अशी त्यांची इच्छा होती.
ज. वि. पवार सांगतात की, आपण पाठवलेली पत्र रमाबाईंनी वाचावी, मला पाहिजे असलेलं पुस्तक आणून देता यावं, असं बाबासाहेबांना वाटत होतं. अशिक्षित राहिल्या तर महिलांची प्रगती खुंटते. त्यामुळं त्यांची प्रगती व्हावी हे त्यामागचं कारण होतं, असं ते सांगतात.
पण रमाबाई मात्र सुरुवातील यासाठी तयार नव्हता. या वयात हातात पाटी घेऊन शिकायला कसं जायचं असा प्रश्न त्यांना पडलेला होता. त्यासाठी त्या तयार नव्हत्या.

फोटो स्रोत, Priyanka Ubale
त्यामुळं बाबासाहेबांनी त्यावरही उपाय शोधला आणि त्यांनी स्वतः रमाबाईंना घरातच शिकवायचं ठरवलं. तसंच रमाबाईंचे सासरे रामजीराव यांनीही रमाबाईंना शिकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रमाबाईंचं शिक्षण घरातच सुरू झालं.
एकीकडे संसार सुरू असतानाच बाबासाहेबांचं शिक्षण अव्याहतपणे सुरू होतं. याचदरम्यान रमाईंच्या जोडीनं फुललेल्या त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक नवं फुल उमललं.
1912 मध्ये बाबासाहेब आणि रमाबाई यांना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. दरम्यानच्या काळात बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाड महाराजांनी नोकरी दिली होती. त्यांचं शिक्षणही सुरू होतं. एव्हाना त्यांचं बीए पूर्ण झालं होतं.
बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी हातभार
शिक्षणासाठी असलेलं झपाटलेपण हे काही त्यांना फक्त अशा संसार आणि नोकरीसारख्या मोहात अडकून राहू देत नव्हतं. त्यांना आणखी शिकायचं होतं. त्यासाठी अमेरिकेला जायचं होतं. त्यासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड महाराजांची मदतही झाली.
पण इथं एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही बाबासाहेबांच्या खांद्यावर आलेली होती. त्यामुळं कुटुंबाकडं लक्ष द्यायचं की शिक्षणासाठी परदेशी जायचं या विचारचक्रात ते अडकलं होते.
बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, रमाबाई पुढं आल्या आणि त्यांनी बाबासाहेबांचं हे ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलं.
खरं तर रमाबाई या त्यावेळी दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्या होत्या. त्यांना स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं होतं. पण तरीही त्यांनी कशाचाही विचार न करता बाबासाहेबांना संसाराच्या या चक्रातून मोकळं केलं. कुटुंबाची संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यामुळं बाबासाहेबांनीही निश्चिंत होत, अमेरिकेला जायची तयारी सुरू केली.

फोटो स्रोत, other
"रमाबाईंनी त्यांचे सासरे सुभेदार मेजर रामजी बाबा यांना शब्द दिला होता की, बाबासाहेबांच्या अभ्यासात खंड पडू देणार नाही. त्या वचनाला रमाबाई अखेरपर्यंत जागल्या," असं ज.वि. पवार यांनी सांगितलं.
त्यामुळं अखेर बाबासाहेब अमेरिकेला गेले आणि जगातील त्या काळातील सर्वात प्रतिष्ठित अशा कोलंबिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेऊन शिक्षण सुरू केलं.
अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यानंतर बाबासाहेबांनी रमाबाईंना पत्र लिहिलं. ते पत्र मिळाल्यानंतर 'प्रिय रामू' हे शब्द वाचताच रमाईंना बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाचं महत्त्व लक्षात आलं.
यानंतर रमाबाई आणि बाबासाहेब यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारांवरून त्यांच्यात असलेलं खास नातं अधिक दृढ होत गेलं. त्यानंतर जगालाही रमाईंच्या योगदानाबद्दलची माहिती याच पत्रांमुळं झाली.
पहिल्या पत्राच्या आठवणी
बाबासाहेबांनी रमाबाईंना लिहिलेली पत्रं अनेक पुस्तकांमधून समोर आलेली आहेत. त्यात कोलंबियातून पाठवलेल्या पहिल्या पत्राचाही उल्लेख आहे.
या पत्रात बाबासाहेब म्हणतात की, "मी अमेरिकेत शिकल्यानं एक नवा इतिहास घडणार आहे. आपल्याला जो विरह सहन कराला लागणार आहे, तोच आपल्याला महान बनवेल. अशा दुःखानं दुःखी व्हायचं नाही. रमा मी खूप पुढं जायचं ठरवलं आहे. त्यात यश मिळालं तर मी दलितांची गुलामीची बंधनं तोडेन. या लढाईत तुला माझी साथ द्यावी लागेल."
बाबासाहेबांनी तेव्हाच्या अमेरिकेचं वर्णन करताना म्हटलं होतं की, "भारत आणि इथल्या जीवनात खूप फरक आहे. इथं जातीवाद, अस्पृश्यता आणि उच्च-नीच असा भेदभाव नाही. इथं सगळे मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतात."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
रमाबाईंनी या पत्राला उत्तर लिहिलं होतं.
"मला कष्टांची काळजी नाही. तुम्ही खूप शिका. आमची चिंता करू नका. मी तुमच्या बरोबर आहे. काहीही अडचणी आल्या तरी मी सहन करेन. मागे हटणार नाही," असं सांगत बाबासाहेबांच्या चिंता त्यांनी दूर केल्या होत्या.
रमाबाई आणि बाबासाहेब यांच्यातील ही पत्रं अनेक लेखकांच्या पुस्तकात आहेत. पण काही लेखक ही पत्रं बाबासाहेबांनी लिहिलेली असण्याबाबतही शंका व्यक्त करतात.
संघर्षाने सोडली नाही पाठ
बाबासाहेब अमेरिकेत उच्च शिक्षण घेत होते. 1913 ते 1917 या चार वर्षांसाठी ते अमेरिकेत राहणार होते. इकडे भारतात मात्र रमाबाईंची तारेवरची कसरत चाललेली होती. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. आर्थिक स्थितीही हलाखीची होती.
त्यामुळं गर्भवती असतानाही अत्यंत कष्टाचं काम करून त्यांना उदरनिर्वाह चालवावा लागत होता. त्यामुळं शेण गोळा करून त्याच्या गोवऱ्या तयार करून त्या विकून मिळालेल्या पैशात त्या खर्च भागवत होत्या.
एवढ्या सगळ्या अडचणींमध्ये रमाबाईंना आनंदी करणारी एक घटना घडली. रमाईंनी दुसरा मुलगा रमेशला जन्म दिला. पण हा आनंदही फार काळ टिकला नाही.
हलाखीच्या स्थितीमुळं ते बाळ गंभीर आजारी पडलं आणि पैसे नसल्यानं उपचारांच्या अभावानं त्याचा मृत्यू झाला. त्याचा रमाबाईंना खूपच त्रास झाला. बाबासाहेबांना त्रास नको म्हणून त्यांनी खूप उशिरा याबाबत त्यांना सांगितलं.
पुढं 1917 मध्ये बाबासाहेब परत आल्यानंतर त्यांच्या अडचणी काहीशा कमी झाल्या. पण तरी पूर्ण दुःख मिटलं नाही. त्यांचं तिसरं अपत्य असलेली मुलगी इंदूही जन्मानंतर काही दिवसांत देवाघरी गेली.
त्यात बाबासाहेबांना अर्ध्यावर सोडलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा विदेशात जायचं होतं. त्यासाठी ते पैसे गोळा करू लागले. त्यामुळं पगारातील मोजक्या रकमेत घर चालवताना रमाईंना अनेक अडचणी यायच्या. सगळ्याच गोष्टींवर निर्बंध आली होती.
अनोखं नातं
रमाबाईंचा देवावर प्रचंड विश्वास होता. तर बाबासाहेबांचा मात्र यावर विश्वास नव्हता. त्यामुळे ते रमाईंना समजवायचे. रमाबाईंना ते पटायचंही. पण देवावरचा विश्वासही कमी होत नव्हता. त्यामुळं त्या बाबासाहेबांच्या लपून देवाची पुजा करायच्या.
ज.वि. पवार यासंदर्भातला एक किस्सा सांगतात. रमाईंची विठोबावर श्रद्धा होती. त्यामुळं त्यांना पंढरपूरला दर्शनासाठी जायचं होतं. त्यांनी तशी इच्छा बाबासाहेबांना बोलून दाखवली.

फोटो स्रोत, other
पण, जातीभेदामुळं दर्शनाला जाऊ दिलं जात नसल्याचं माहिती असल्यानं बाबासाहेब त्यांच्यावर रागावले. विठोबा खालच्या जातीतील लोकांना दर्शन देत नाही, असं त्यांनी रमाबाईंना समजावलं. जनसेवेच्या माध्यमातून आपण ठिकठिकाणी पंढरी तयार करू असं त्यांनी सांगितलं.
रमाईंना ते लक्षात आलं. बाबासाहेबांचं नेमकं म्हणणं त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी हट्ट सोडला होता. आपल्या पतीला जगात हवी असलेली समानता काय आहे, ते त्यांना समजलं होतं.
'पोटच्या गोळ्याची वेदना'
रमाबाईंना अनेकदा बाबासाहेबांचा राग यायचा. पण मोठ्या कार्याच्या उद्देशानं त्यांचे चाललेले प्रयत्नही त्यांना दिसत होते. त्यामुळं त्या पुन्हा त्यांच्या पाठिशी उभं राहायच्या.
1920 मध्ये बाबासाहेब पुन्हा लंडनला शिक्षणासाठी गेले. त्यानंतरही त्यांचा तिसरा मुलगा गंगाधर याचा मृत्यू झाला. ही दुःखं रमाबाईंची पाठ सोडत नव्हती.
बाबासाहेब 1923 ला इंग्लंडमधून परत आले. त्यानंतर जणू सगळ काही ठिक होणार असं वाटत होतं. बाबासाहेबांनी वकिली सुरू केली होती. सगळं काही ठिक होतं. पण 1926 मध्ये रमाईंचं सर्वात लहान मूल राजरत्नचाही मृत्यू झाला.
रमाबाईंना झालेल्या पाच मुलांपैकी फक्त मोठा मुलगा यशवंत वाचला होता. इतर चौघांचं निधन झालं होतं.
राजरत्नच्या मृत्यूनंतर रमाबाई आणि बाबासाहेब यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता. ते लवकर या धक्क्यातून बाहेर पडू शकले नाही. बाबासाहेब तर विरक्तीच्या मार्गावर जाण्याच्या विचारात असताना रमाईंनीच त्यांना कर्तव्याची आठवण करून दिली आणि पुन्हा कामाकडे वळवलं.

फोटो स्रोत, other
दुसरीकडं प्रचंड कष्ट आणि केलेल्या कामांमुळं रमाईंची प्रकृती कायम खराब होत होती. त्या सारख्या आजारी असायच्या. हळूहळू त्यांचे त्रास वाढत गेले.
बाबासाहेबांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हवा बदलासाठी त्यांना इतर ठिकाणी नेलं. पण त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही.
27 मे 1935 रोजी रमाईंनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अनेक दिवस बाबासाहेबांनी स्वतःला कोंडून घेतलं. ते कोणाशीही बोलत नव्हते. आपली रामू गेली यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता.
रमाईंच्या जाण्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली होती. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जवळचा मित्र हरपला होता. रमाईंच्या जाण्यानंतर आलेल्या बाबासाहेबांच्या 'थॉट्स ऑफ पाकिस्तान'ची अर्पण पत्रिका पाहिली तर त्यांना केवढा धक्का बसला होता हे लक्षात येतं.
"कोणी मित्र नसलेल्या दिवसांमध्ये आमच्या वाट्याला आलेले दारिद्रय आणि विवंचना मनोधैर्याने आणि तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दाखवली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण करत आहे."
अशी होती बाबासाहेबांनी अर्पण केलेली पत्रिका.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.