उष्माघात टाळण्यासाठी काय कराल?

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर आणि मध्य भारत आणि पश्चिमेकडील काही भागांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून उष्णता प्रचंड वाढली आहे. तसंच कमाल तापमान 45-46C च्या आसपास आहे आणि काही भागात ते 50 अंशापर्यंत पोहोचलं आहे.
मात्र, मान्सून सुरू झाल्यानं येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
या उन्हाळ्यात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त होतं. दिल्लीसारख्या शहरात तर पारा पन्नाशीला टेकला होता.

उष्माघात कसा ओळखावा?
उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फॅरनहाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणंसुद्धा दिसतात.
लहान मुलांनी काही आहार घेण्यास नकार दिला, किंवा चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांना उष्माघात झाला असू शकतो.
उष्णतेची लाट येते, तेव्हा उष्माघात होण्याचं प्रमाण वाढतं.
उष्माघाताची लक्षणे
- चक्कर येणे, उल्ट्या होणं, मळमळ होणे.
- शरीराचे तापमान जास्त वाढणे.
- पोटात कळ येणे.
- शरीरातील पाणी कमी होणे.
उष्माघात झाल्यास काय कराल?
- तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- दरम्यानच्या काळात, संबंधित व्यक्तीला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
- ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
- त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
- एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
- त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.
- त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.