सुरेश प्रभू : बाळासाहेब ठाकरेंनी मंत्री केलं आणि 'अनफिट' ठरवून ‍काढलंही, कारण...

सुरेश प्रभू

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, नामदेव काटकर
  • Role, बीबीसी मराठी

भारतीय राजकारणात निवृत्तीची घटना ही फार दुर्मिळ बनलीय. शेवटपर्यंत मिळेल ते पद पदरात पाडून घेण्याची संधी शोधणारे खोऱ्याने असताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या राजकारणातून निवृत्तीची घटना काही महिन्यांपूर्वी बातमीचा विषय ठरली होती.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना सोडणाऱ्यांचीही चर्चा होते. सुरेश प्रभू हे त्यातील एक.

हेच निमित्त साधत सुरेश प्रभू यांच्या सार्वजनिक आयुष्यातील काही प्रसंगांचा आढावा.

बाळासाहेब 'एलिस इन वंडरलँड' म्हणाले ती घटना

20 ऑगस्ट 2002 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून सुरेश प्रभू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. ते ऊर्जामंत्री होते.

सुरेश प्रभू 'मिस्टर क्लिन' म्हणून तेव्हाही ओळखले जात. पक्ष चालवायला पैसे लागतात आणि सुरेश प्रभूंकडून ते शक्य नसल्याचे बाळासाहेब जाहीर बोलून दाखवत असत. पक्षनिधीसाठी कुठेही मंत्रि‍पदाचा वापर करण्यास सुरेश प्रभूंनी नकार दिल्याचा संताप बाळासाहेबांना होता, असं ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन सांगतात.

या राजीनाम्याच्या काही दिवस आधीच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंनी सुरेश प्रभूंना 'एलिस इन वंडरलँड' म्हटलं होतं.

एलिस इन वंडरलँड परीकथा आहे. एलिस नामक मुलगी अशा ठिकाणी जाते, जिथं सर्व अद्भूत असतं, ती तिथं गोंधळून जाते.

या परीकथेची उपमा देऊन बाळासाहेबांना सूचवायचं होतं की, प्रभू मंत्रि‍पदावर योग्य नाहीत.

बाळासाहेबांची मुलाखत आणि सुरेश प्रभूंचा राजीनामा हा आठवड्याच्या अंतरानं घडलेल्या घटनांनंतर 23 ऑगस्ट 2002 रोजी ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल यांनी प्रभूंच्या राजीनाम्यावर लेख लिहिला होता आणि त्याचा मथळा होता - 'एंड ऑफ द फेरी टेल'.

बाळासाहेबांनी सुरेश प्रभूंचं वर्णन करण्यासाठी केलेला 'एलिस इन वंडरलँड' या परीकथेचा मथळा आणि बाळासाहेबांच्या नाराजीनंतर प्रभूंना तेव्हा द्यावा लागलेल्या राजीनाम्यानंतर सुचेता दलाल यांनी 'एंड ऑफ द फेरी टेल' म्हणत 'परीकथेचा शेवट' म्हणणं, या दोन्ही गोष्टी सुरेश प्रभू यांच्या 'आदर्श राजकारणा'चं, मात्र त्याचवेळी भारतातील राजकारणात ते किती 'अनफिट' होते, याचं वर्णन करणाऱ्या आहेत.

या घटनेनंतर बरोबर 20 वर्षांनी म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 रोजी सुरेश प्रभूंनी राजकारणातून निवृत्तीची घटना घडली, त्यावेळीही एका चांगल्या राजकारण्याला आपण बाहेरचा रस्ता दाखवल्याची भावना उमटली. 2002 च्या प्रसंगांचीही अनेकांनी आठवण काढली.

11 जुलै 1953 रोजी जन्मलेल्या सुरेश प्रभूंचं राजकीय आयुष्य अवघं 26 वर्षांचं आहे.

या 26 वर्षांत चारवेळा लोकसभेत आणि दोनवेळा राज्यसभेत, तसंच रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, अर्थ मंत्रालय अशा पहिल्या पाच-सहात मानल्या जाणाऱ्या मंत्रिपदं त्यांच्या पदरात पडली.

भारतावर दूरगामी वाटचालीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नदीजोड प्रकल्प असेल, उडाण प्रकल्प असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेल, अशा महत्वाच्या गोष्टी त्यांच्या कारकीर्दीत घडल्या.

पण या राजकीय क्षेत्राच्या पलिकडेही सुरेश प्रभू यांचं काम आहे. त्यांचाही यातून आढावा घेणार आहोत. राजकारणाव्यतिरिक्त क्षेत्रात मात्र ते कधीच 'एलिस इन वंडरलँड' ठरले नाहीत.

सीएच्या परीक्षेत देशभरात अव्वल

प्रभूंचा जन्म मुंबईतलाच. शिक्षणही मुंबईतलंच. दादरची प्रसिद्ध शारदाश्रम विद्यामंदिर ही त्यांची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा. त्यानंतर त्यांनी विलेपार्ल्यातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातून बी. कॉम (ऑनर्स) ची पदवी घेतली.

त्यानंतर मुंबईतल्याच न्यू लॉ कॉलेजमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं.

त्यानंतर चार्टर्ड अकाऊंटंटचं शिक्षणही घेतलं. या इंटर सीए परीक्षेत त्यांनी देशात अव्वल स्थान पटकावलं.

या शिक्षणानंतर स्वत:ची सीए फर्म सुरू केली आणि बँकिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. यातील बँकिंग क्षेत्रातील त्यांची कामगिरी अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. कारण वयाच्या तिशी-पस्तिशीत त्यांनी मोठमोठ्या सहकारी बँकांच्या मोठ्या पदावर काम केलं.

शरद पवारांनी सुरेश प्रभूंना सहकार क्षेत्रात आणलं

सुरेश प्रभूंनी सारस्वत बँकेचे अध्यक्ष असतानाचा एक किस्सा एबीपी माझावरील माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितला होता.

शंकरराव कोल्हे हे तेव्हा महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. त्यावेळी दत्त शिरोळ साखर कारखान्यात एक सहकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी सुरेश प्रभूंना व्याख्यान द्यायला बोलावलं.

सुरेश प्रभू

फोटो स्रोत, Getty Images

सुरेश प्रभू सांगतात, "मी चहात सुद्धा साखर घेत नाही. त्यामुळे साखरेचा तसा काही संबंध नाही. पण सहकारमंत्रीच सांगतायेत म्हटल्यावर बोलावं लागेल. राजकारणात पुढे आलो, त्याचं हे एक कारण असेल. ज्यात काही माहीत नाही, त्यातही बोलायची सवय झाली असेल मला.

तर तिथं भाषण केलं. शरद पवारसाहेब समोर बसले होते. तिथं ते मला ऐकत होते. त्याआधी त्यांचा आणि माझा अजिबात परिचय नव्हता. त्यांना एकदाही भेटलो नव्हतो. पण मग त्यांनी मला राज्य सहकारी बँकेवर त्यांचं नॉमिनी नेमलं."

इथून मग पुढे सुरेश प्रभू यांचं सहकार क्षेत्रातला वावरही वाढला.

सहकार क्षेत्रात येण्याआधी ते बँकिंग क्षेत्रात सक्रीय होतेच. सारस्वत बँकेचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष होते. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी सारस्वत बँकेचं प्रमुखपद सांभाळलं होतं.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समित्या, कॉन्फरन्स, संस्था इत्यादींमध्ये सुरेश प्रभू कार्यरत होते आणि आजही आहेत. या सर्वांच्या निमित्तानं ते जगातील जवळपास 150 देशांमध्ये फिरले आहेत.

ऋतुरंग दिवाळी अंकासाठी मुलाखत घेण्यासाठी एकदा गेलो असता, त्यांनी माझ्याशी बोलताना म्हटलं होतं की, "कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जी-20 च्या बैठकीसाठी सौदी अरेबियातून परतल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावं लागलं, तेव्हा बराच वेळ एकट्याला मिळाला. तेव्हा 30-40 वर्षांची डायरी पाहिली, तर लक्षात आलं एकाच शहरात मी दोन-तीन दिवस सलग थांबलो नाही. माझे मित्र म्हणायचे की, तू संन्यासी आहेस. मला हे काहीप्रमाणात मान्यही आहे."

सुरेश प्रभू राजकारणात कसे आले?

बँकिंग आणि सहकार क्षेत्रात काम करत असताना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या संस्थांसोबत जोडले जात असताना, सुरेश प्रभू अचानक राजकारणात कसे आले, हा अनेकांसाठी प्रश्न असतो.