डोंगरी इमारत अपघात: मुंबईचे लोक किड्या-मुंग्यांसारखी मरू नयेत म्हणून या 9 गोष्टी करा

सूचना
  • Author, नामदेव अंजना
  • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई नावाची चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त होतेय. केसरबाई इमारत सुमारे 100 वर्षं जुनी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

इमारत कोसळल्यानंतर पोलीस, स्थानिक प्रशासन, NDRF, अग्निशमन दल यांसाह विविध सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावून येतात. मात्र मोठ्या संख्येत जीवितहानी करणाऱ्या या घटना घडण्याआधीच का थांबवता येत नाही? त्यासाठी काय करता येईल? काळजी घेता येईल, कोणत्या गोष्टी करता येतील?

1. लोकांना विश्वासात घेण्याची गरज

इमारतींचा पुनर्विकास करत असताना रहिवाशांना विश्वासात घेण्याची गरज आहे. म्हाडा किंवा तत्सम विभागांवर रहिवाशांचा विश्वास उरला नसल्याने पुनर्विकासाच्या प्रक्रियेला कुणी सामोरं जाण्याचं धाडस करत नाही, असं डॉ. अमिता भिडे सांगतात.

डॉ. अमिता भिडे या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत (TISS) प्राध्यापिका आहेत. नगररचना या विषयाच्या त्या अभ्यासक आहेत.