मुघल गार्डनचं नाव आता अमृत उद्यान: नामांतराचा ट्रेंड, राजकारण की आणखी काही?

यावर्षी ज्यांना दिल्लीतील प्रसिद्ध राष्ट्रपती भवनातील 'मुघल गार्डन'ला भेट द्यायची आहे, ते लोक 31 जानेवारीपासून तिथं पोहचायला सुरुवात करतील. तेव्हा त्यांना 'मुगघल गार्डन’ हे नाव कुठेच दिसणार नाही. राष्ट्रपती भवनातील सर्व उद्यानांचं ‘अमृत उद्यान’ असं नामकरण करण्यात आलं असून, ‘मुघल गार्डन’चा फलकही हटवण्यात आल्याची माहिती शनिवारी (28 जानेवारी) देण्यात आली. राष्ट्रपती भवनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, रविवारपासून उद्यान उत्सव 2023 निमित्त 'अमृत उद्यान'मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. 31 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत ते लोकांसाठी खुलं केलं जाईल. राष्ट्रपतींच्या माध्यम उप-सचिव नाविका गुप्ता यांनी सांगितलं की, राष्ट्रपती भवनातील सर्व उद्यानांना आता 'अमृत उद्यान' म्हटलं जाईल.

फोटो स्रोत, ani
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी 'मुघल गार्डन'च्या जागी 'अमृत उद्यान'चा बोर्ड लावण्याचा व्हीडिओ ट्विट केला आहे.
सोशल मीडियावर चर्चा
जुने फलक बुलडोझरवर ठेवून ते काढून घेतल्याचं काही व्हीडिओंमध्ये दिसत आहे आणि याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. शनिवारी ही बातमी येताच भाजपच्या नेत्यांनी सोशल मीडियावर या निर्णयाचं स्वागत केलं.

फोटो स्रोत, ani
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करून म्हटलं की, “गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा मोदी सरकारचा हा आणखी एक ऐतिहासिक निर्णय आहे.” तर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी एक व्हीडिओ ट्विट करून लिहिलं की, "गुलामीचे आणखी एक प्रतीक संपलं. मुघल गार्डन आता राहिलं नाही, आता ते अमृत गार्डन आहे."
ही नावं बदलली...
2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून अनेक शहरांची, रस्ते आणि स्थानकांची नावं बदलण्यात आली आहेत. त्यावरून राजकारणही होत आहे.
आता ज्या राष्ट्रपती भवनाच्या 'मुघल गार्डन'चं नामकरण करण्यात आलं, तिथून बाहेर पडणाऱ्या 'राजपथ'च नाव गेल्या वर्षीच बदलण्यात आलं होतं.
मोदी सरकारनं 2022 मध्ये इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या 'राजपथ'चं नाव बदलून 'कर्तव्य पथ' केलं होतं.
याआधी या रस्त्याचं नाव जॉर्ज पंचम यांच्या नावावर 'किंग्स वे' असं होतं. स्वातंत्र्यानंतर ते बदलून 'राजपथ' करण्यात आलं. ऑगस्ट 2015 मध्ये दिल्ली नगरपरिषदेनं 'औरंगजेब रोड'चं नाव बदलून 'एपीजे अब्दुल कलाम रोड' असं केलं होतं. मात्र, या रस्त्याला सरदार पटेल यांचं नाव देण्याची मागणी विविध स्तरातून होत होती.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. तिथंच त्याची कबर आहे. या शहराचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. औरंगजेबानेच या शहराचं नाव औरंगाबाद ठेवल्याचा दावा केला जातो. ऐंशीच्या दशकापासून औरंगाबादचं नाव बदलून 'संभाजीनगर' करावं, अशी शिवसेनेची मागणी आहे आणि गेल्या वर्षीच सरकार वाचवण्याच्या अखेरच्या प्रयत्नात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं जून 2022 मध्ये शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
मात्र भाजप आघाडी सरकारनं सत्तेवर येताच पुन्हा या शहराचं नाव बदलण्याचा आदेश जारी केला. यावेळी औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर अनुक्रमे 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' असं करण्यात आलं.
आणखी मागे जाऊन पाहायचं म्हटलं तर, मुंबई आधी बंबई किंवा बॉम्बे या नावानं ओळखली जात होती. या शहराचं नामकरण 1995 मध्ये तत्कालीन शिवसेना सरकारनं केलं. त्याचप्रमाणे 1996 मध्ये मद्रासचे चेन्नई आणि 2001 मध्ये कलकत्त्याचे कोलकाता असं नामकरण करण्यात आलं.
नाव बदलण्यामागे राजकारण
एखाद्या शहराचं नाव बदलण्यामागे 'ध्रुवीकरणाचा हेतू' असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत काही विश्लेषक व्यक्त करत आहेत.
भाजपशासित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये, प्रसिद्ध शहर 'अलाहाबाद'चं नाव बदलून 'प्रयागराज' करण्याचे आदेश दिले. यानंतर लगेचच, भाजपशासित हिमाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राज्याची राजधानी शिमलाचे नाव बदलून 'श्यामला' करण्याची मागणी केली. त्यावेळी बराच गदारोळ झाला.
ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी यांनी याचं वर्णन 'ध्रुवीकरणाला चालना देणार' असे केले होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "निवडणुकीला सामोरं जाण्याआधी भाजपमध्ये कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि त्याला धार्मिक ध्रुवीकरण हवं आहे, असं यातून दिसतं."

फोटो स्रोत, Getty Images
त्रिपाठी यांच्या मते, "भाजपला असा वाद निर्माण करायचा आहे की, तो फक्त हिंदू-मुस्लिम पुरता मर्यादित राहावा आणि सध्याचे ज्वलंत प्रश्न जसे की बेरोजगारी, महागाई किंवा कायदा आणि सुव्यवस्था यावरुन लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवावं." 2018 मध्येच 4 जून रोजी उत्तर प्रदेशच्या 'मुघलसराय' रेल्वे जंक्शनचं नाव बदलून 'पंडित दीनदयाळ उपाध्याय’ जंक्शन करण्यात आलं. याबाबत माहिती देताना तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या अधिसूचनेची एक प्रत ट्विट केली आणि लिहिलं, "मला आनंद आहे की, ज्यांनी अंत्योदय सारखी छान कल्पना मांडली त्या पंडित दीनदयाळ यांच्या नावानं हे जंक्शन आता ओळखलं जाईल."
नाव बदलण्याची प्रथा
दिल्लीतील अकबर रोडचं नाव बदलण्याची मागणीही सातत्यानं होत आहे. या रस्त्याचं नाव बदलू इच्छिणाऱ्यांनी याठिकाणी लावण्यात आलेल्या साइन बोर्डवरही काळेही फासले आहे. नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचं नाव या रस्त्याला देण्यात यावं, अशी मागणी होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार विवेक शुक्ला यांच्या मते, "देशाच्या स्वातंत्र्यानंतर राजधानी दिल्लीत अलबुकर्क रोडचं नाव सर्वांत पहिल्यांदा बदलण्यात आलं." त्यांच्या एका लेखात ते स्पष्ट करतात की, "अल्बुकर्क रोडचं नाव बदलल्यानंतर रस्त्यांची नावं बदलण्याची जी प्रक्रिया सुरू झाली, ती पुढे सुरूच राहिली.” ते पुढे सांगतात, "नवी दिल्लीत एकापेक्षा एक अशा सुंदर इमारतींचं डिझाईन बनवणाऱ्या एडविन लुटियन्स यांच्या नावावर शहरात कोणताही रस्ता नाही. ते 10 राजाजी मार्गावरील बंगल्यात राहत होते." संकलन: संदीप राय
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)