'तर कोकण म्हणजे स्वर्ग असं म्हणता येणार नाही', दोडामार्गला इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळल्याचं प्रकरण काय आहे?

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
निसर्गसंपन्न दोडामार्ग परिसर हा इको सेन्सिटिव्ह नाही. अनेक वेळा शिफारशी दिल्या जाऊन आणि आंदोलने होऊन देखील अद्याप हा परिसर इको सेन्सिटिव्ह न केल्यामुळे, पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे, स्थानिक आणि पर्यावरणवादी म्हणत आहेत. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने हा परिसर इको सेन्सिटिव्ह करण्याबाबत आदेश काही महिन्यांआधी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने दोडामार्ग परिसराला भेट देऊन लिहिलेला हा रिपोर्ताज.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातला दोडामार्ग परिसर गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा महत्त्वाचा भाग आहे. मोपा विमानतळालगतचा हा भाग सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे.
पश्चिम घाटाचा भाग असणाऱ्या या परिसराला सरकारच्या लेखी मात्र 'इको सेन्सेटिव्ह' ठरवलं जात नाहीये. आणि त्यामुळेच इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी लढा उभारला आहे.
पर्यावरणवाद्यांच्या मागणीबाबत सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले आहे.
तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर बोलण्यास संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी देखील तयारी दर्शवली नाहीये.
'निसर्गसंपन्न परिसर पण या गोष्टींमुळे पालटलं चित्र'
पणजीकडून महाराष्ट्राकडे जाताना मोपा विमानतळाचा परिसर दिसायला लागतो आणि ठिकठिकाणी होऊ घातलेल्या विकासाच्या खुणाही नजरेस पडतात.
थोडं पुढे गेलं की, लहानशा वाड्या नजरेस पडायला लागतात. वळणं घेणारा रस्ता लहान लहान होत जातो. आणि मोबईलला नेटवर्कही नसणाऱ्या भागात निसर्गसंपन्नता म्हणजे काय, याची साक्ष सह्याद्रीच्या पश्चिम घाटातलं हे जंगल देतं.
याच रस्त्यावरुन पुढे जात लागतं ते झोळंबे गाव. या गावातल्या डोंगर उतारावर कोसळलेल्या कड्याच्या खुणा आजही स्पष्ट दिसतात.
झोळंबेतल्या याच डोंगराच्या कुशीत कुंदेकर यांचं घर आहे. घरात चूल आणि कोळशाने ठिकठिकाणी केलेला धूर त्या घरात वसतीला अध्येमध्ये कोणी येत असल्याचं सांगत असतात.
पण हे काही दिवस राहणं सोडलं तर कुंदेकरांचं संपूर्ण कुटुंबच जवळच्या गावात स्थलांतरित झालंय. याला कारणीभूत ठरली आहे ते 2019 मध्ये या घरावर कोसळलेली दरड.


खरंतर त्या दिवशी पडला तसा पाऊस सवयीचा असल्याचं गोविंद कुंदेकर सांगतात.
जेव्हा चिखल वाहून यायला लागला तेव्हा बाजूने वाहणाऱ्या ओढ्याच्या बांधाला काही झालं असावं असं म्हणून गोविंद यांच्या घरातील लोक डागडुजी करायला गेले. पण ते खाली आले ते चिखल आणि राडारोड्यातून वाहतच.
गोविंद कुंदेकर सांगतात, "रात्री साडेआठला ही घटना झाली तेव्हा घरचे नीट करायला गेले तर स्फोट होतो तसा आवाज झाला आणि चिखल आणि माती सगळंच वाहत आलं एकत्र. ते सगळेही जवळपास 60-70 फूट खाली वाहत आले."
त्यातून बाहेर पडून त्यांनी घरच्यांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेलं. हे आवाज रात्रभर येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी परत चिखल आणि माती वाहून आली. त्यावेळी आजूबाजूचा पूर्ण परिसर चिखलात गेला.
"आमच्या राहत्या घराच्या तिन्ही बाजूंना कमरेइतका चिखल होता," असं कुंदेकर सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
गेल्या काही दिवसात या परिसरातील लागवडीच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण वाढल्याचे ते सांगतात.
पूर्वी त्यांच्या घराच्या समोर सुपारी तर वरच्या बाजूला डोंगरात नाचणीची शेती होती. पण कालांतराने तिथे काजूची लागवड सुरू झाली.
यासाठी झालेल्या खणण्यामुळे ही परिस्थिती आल्याचा दावा कुंदेकर करतात.
"सगळ्यांत प्रमुख कारण म्हणजे रस्ते. जे पहिल्यांदा आमच्या वाडीपर्यंत घरापर्यंत रस्ते येत नव्हते. पुढे घरापर्यंत रस्ता यायला पाहिजे असं सगळ्यांचं मत पडलं. मग ग्रामपंचायतीत प्रस्ताव येऊन स्थानिक लोकांनी रस्ता काढला. मग नंतर वरती ज्यांची जमीन होती तिकडे काजू प्लॅन्टेशनसाठी जेसीबी वगैरे नेण्यात आले. जेसीबीने खणून वगैरे झालं. त्याच्यामुळे कदाचित झालं असावं असं वाटतं."
कुंदेकर म्हणतात की, "भूगर्भशास्त्रज्ञांचं म्हणणं होतं की जंगलतोड आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे हे झालं असेल. म्हणजे ज्यावेळी प्लॅन्टेशन होते त्यावेळी नैसर्गिक प्रवाह होते तिथे माती टाकण्यात आली. ज्यावेळी जेसीबी रिटर्न आला त्यावेळी ती काढण्यात नाही आली. त्यामुळे ते प्रवाह दुसऱ्या बाजूला प्रवाहित झाले."

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
हाच विकास आपल्या मुळावर उठला असल्याचा दावा स्थानिक नागरिक करत आहेत.
माधव गाडगीळांनी त्यांच्या 'सह्यचला आणि मी' या पुस्तकात ज्या परिसराचा उल्लेख हा पश्चिम घाटातला अतिसंवेदनशील भाग म्हणून केलाय. तो वाचवण्यासाठी आज इथल्या स्थानिकांवर लढा उभारण्याची वेळ आली आहे.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
दोडामार्ग परिसराचं महत्त्व काय?
देवराया असलेलं हे जंगल पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. किंग कोब्रा आणि इतर अनेक प्राणी दिसणारा हा परिसर निसर्गसंपन्न आहे.
वाघ, हत्ती, ब्लॅक पँथर अशा अनेक प्राण्यांचा हा अधिवास आहे. याच बरोबर अनेक महत्त्वाच्या वनस्पती सुद्धा इथे आढळतात. यातील महत्त्वाचा अधिवास मायरिस्टिका स्वॅम्प हा आहे.
पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ मंदार दातार सांगतात, " महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा दोडामार्गचा भाग निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या भागात मायरिस्टिका स्वॅम्प नावाचा अधिवास आहे. मायरिस्टिका म्हणजे जायफळ. त्या जातीच्या किंवा त्या प्रकारच्या वनस्पतींची ही जंगलं असतात. हा अधिवास सदाहरित असतो. त्या वनस्पतीच्या नावावरुनच मायरिस्टिका स्वॅम्प असं म्हटलं जातं."
मायरिस्टिका स्वॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे जंगलात दलदल असते. या दलदलीमुळे सदाहरित जंगलात येणाऱ्या झाडांची मुळं खोलवर जाऊ शकत नाही. जर झाडांची वाढ उंच व्हायची असेल तर मुळं खोलवर जाणे आवश्यक आहे पण दलदलीमुळे ते शक्य होत नाही. पण निसर्ग त्याला पर्याय शोधतो. मुळांची वाढ खोलवर होण्याऐवजी 'इनवर्टेड नी रूट' किंवा U आकारात होते. याच प्रकारच्या मुळांचे एक जाळे तयार होते आणि त्यातून या अधिवासाची निर्मिती होते, असं दातार समजावून सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
स्थानिक रहिवासी प्रसाद गावडे सांगतात, "महाराष्ट्रात किंग कोब्राचा नैसर्गिक अधिवास असणारे हे एकमेव ठिकाण आहे. वनविभागाला अलीकडेच झोळंबे गावात किंग कोब्रा दिसला. तसंच इथं विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीदेखील आहेत. ओरिएन्टल किंगफिशर, हॉर्नबिल असे पक्षी आणि फुलपाखरांच्या काही जाती आढळतात. महाराष्ट्रातलं हे जंगल आहे कर्नाटक आणि गोव्यातील वाघाचं कॉरिडोअर आहे. जर हा इको सेन्सेटिव्ह नसेल तर इथं वाघ फिरणार कसा");