'आंदोलन तूर्तास थांबवा', राज ठाकरेंचा मनसैनिकांना आठवड्याभरात नवा आदेश

फोटो स्रोत, MNS ADHIKRUT/YOUTUBE
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात व्यवहारात मराठी भाषा वापरली जावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्याच्या भाषणामध्ये केलं होतं.
महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या, असा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता.
त्याबरहुकूम राज्यातील काही ठिकाणी मनसैनिकांनी आंदोलनही केलं. मात्र, आता हे आंदोलन थांबवण्याचा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
मात्र, यामुळे ते वारंवार अशा पद्धतीनं छेडलेलं आंदोलन मागे घेतात, ते स्वत:च्याच भूमिकेशी कधी एकनिष्ठ नसतात, अशी टीकादेखील त्यांच्यावर सुरू झाली आहे.
'आंदोलन थांबवण्याच्या' आदेशात राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी आज (5 एप्रिल) आपल्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करुन मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याबाबतचं आवाहन केलं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली."
"पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची");