भारत-बांगलादेशमध्ये तणाव, संबंध बिघडले तर कुणाला किती फटका बसेल?

भारत, बांगलादेश

फोटो स्रोत, Getty Images/ANI

भारत आणि बांगलादेश संबंधात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील नेते एकमेकांवर भाष्य करताना दिसत आहेत.

भारताने बांगलादेशला होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवला, तर त्याचे दूरगामी परिणाम होतील, असं भाजपचे नेते म्हणत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, "बांगलादेशातील एक छोटा वर्ग भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेला आहे आणि यामुळे भारताच्या हितावर कोणताही परिणाम होणार नाही.

"भारताने बांगलादेशला बटाटे, कांदे, औषधे, पाणी आणि कापूस यांसारख्या अत्यावश्यक पुरवठा बंद केला, तर त्याचा बांगलादेशवर खूप वाईट परिणाम होईल."

घोष म्हणाले की, "भारताने बांगलादेशशी संबंध तोडलेले नाहीत कारण दोन्ही देशांचे ऐतिहासिक संबंध आहेत. बांगलादेशात असेच अत्याचार होत राहिले तर शेवटी बांगलादेशच्या स्थैर्याला आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच हानी पोहोचेल."

बांगलादेशची भौगोलिक स्थिती पाहता भारतासोबतचे संबंध अतिशय महत्त्वाचे ठरतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

बांगलादेशला 'इंडिया लॉक्ड' देश म्हणतात. कारण या देशाची 94 टक्के सीमा भारताला लागून आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान 4,367 किमी लांबीची सीमारेषा आहे आणि ही सीमा त्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या 94 टक्के आहे. म्हणजे बांगलादेश जवळपास सर्व बाजूंनी भारताने वेढलेला आहे.

अशा परिस्थितीत सुरक्षा आणि व्यापाराच्या बाबतीत बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. त्याच वेळी, बांगलादेश भारताला ईशान्येकडील राज्यांशी सहज आणि सुलभतेने व्यवहार करण्यासाठी मदत करतो. भारताचा उर्वरित भाग ईशान्येकडील राज्यांशी जोडण्यात बांगलादेशची भूमिका महत्त्वाची आहे.

बांगलादेश आणि भारत एकमेकांवर किती अवलंबून आहेत?

बांगलादेश आणि भारत यांच्यात पाणीवाटप, दोन्ही देशांतर्गत होणारे व्यापार आणि निर्वासितांचे मुद्दे महत्त्वाचे राहिले आहेत.

दोन्ही देशांच्या भौगोलिक स्थानामुळे हे मुद्दे भारत आणि बांगलादेशसाठी महत्त्वाचे राहतील. बांगलादेश तांदूळ, गहू, कांदा, लसूण, साखर, कापूस, धान्य, शुद्ध पेट्रोलियम, इलेक्ट्रिक उपकरणे, प्लास्टिक आणि स्टील या सगळ्यांसाठी भारतावर अवलंबून आहे.

कोरोना महामारीच्या आधी बांगलादेशची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत होती आणि त्यामध्ये बांगलादेशातून पाश्चिमात्य देशांना होणाऱ्या कापड निर्यातीची भूमिका मोठी होती.

बांगलादेशातला वस्त्रोद्योग हा भारतातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहे. दिलीप घोष यांना हे माहीत आहे आणि त्यांनी हा दाखला दिला आहे.

बांगलादेश

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेश अनेक बाबतीत भारतावर अवलंबून आहे. वाढत्या तणावाचा तिथल्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

बांगलादेशचे भारतासोबतचे संबंध आणखी बिघडले तर त्याच्या निर्यातीवर परिणाम होईल. याचा परिणाम जीडीपीवर होईल आणि मग महागाईसोबत बेरोजगारीही वाढेल. भारतासोबतच्या बिघडलेल्या संबंधांची किंमत चुकवणे बांगलादेशला सोपं जाणार नाही.

बांगलादेश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि भारत हा बांगलादेशचा आशियातला दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

आशिया खंडात बांगलादेश भारताला सर्वाधिक पैसा निर्यात करतो. बांगलादेशने 2022-23 या आर्थिक वर्षात भारताला दोन अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार $15.9 अब्जांवर गेला होता.

द्विपक्षीय व्यापार

2021 मध्ये भारता बांगलादेशला 14 अब्ज डॉलरची निर्यात करत होता. 2022 साली हा आकडा 13.8 अब्ज डॉलर एवढा होता.

2023 साली ही निर्यात 11.3 अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाली होती. भारताची बांगलादेशातील निर्यात कमी होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मागणीत झालेली घट.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे मागणीत ही घट झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बांगलादेशची अर्थव्यवस्था अजूनही कोविड महामारीपूर्वीच्या काळात परतली नाही.

दरम्यान, शेख हसीना यांची सत्तेतून हकालपट्टी झाली आहे. आणि आता भारताशी बिघडलेल्या संबंधांमुळे बांगलादेशला आर्थिक आघाडीवर आणखी एक धक्का बसू शकतो.

गेल्या आठ वर्षांत भारताने बांगलादेशला विविध विकास प्रकल्पांसाठी आठ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. यामध्ये रस्ते, रेल्वे, जहाजबांधणी आणि बंदरे यांचा समावेश आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशच्या आर्थिक प्रगतीचं खूप कौतुक झालं होतं.

शेख हसीना आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेख हसीना आणि नरेंद्र मोदी

शेख हसीना यांच्या 2009 ते जुलै 2024 या कालावधीत बांगलादेशची अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढली. जीडीपी (GDP)चा आकार 123 अब्ज डॉलर्सवरून 455 बिलियन डॉलर झाला होता.

बांगलादेशचा दरडोई जीडीपी देखील 2009 मध्ये 841 डॉलर्सवरून 2024 मध्ये 2,650 डॉलर्सपर्यंत वाढला होता.

बांगलादेश आणि चीन यांची वाढती जवळीक हा भारतासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.

शेख हसीना पंतप्रधान होत्या, तोपर्यंत त्यांनी चीन आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये समतोल राखला होता, पण आता भारताची चिंता वाढली आहे. आता बांगलादेशची केवळ चीनशीच नव्हे तर पाकिस्तानशीही जवळीक वाढताना दिसत आहे.

भारताची जागा इतर कोणता देश घेऊ शकतो का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्या महिन्यातच एक पाकिस्तानी मालवाहू जहाज कराचीहून बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर असलेल्या चितगाव बंदरात पोहोचलं होतं.

1971 मध्ये झालेल्या बांगलादेश मुक्ती युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये सागरी मार्गाने पहिल्यांदाच संपर्क झाला. पूर्वी दोन्ही देशांमधील सागरी व्यापार सिंगापूर किंवा कोलंबोमार्गे होत असे. पाकिस्तानशी जवळीक वाढण्याची एक ठोस सुरुवात म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

बांगलादेशातील गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत चीन आहे. बांगलादेश हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग आहे. चीनने बांगलादेशमध्ये सात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून 2023 मध्ये चीनने बांगलादेशला 22 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती.

किंग्ज कॉलेज लंडनमधील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्राध्यापक हर्ष पंत म्हणतात की, "बांगलादेशने गेल्या दीड दशकात केलेल्या आर्थिक प्रगतीच्या मार्गात भारतासोबतच्या बिघडलेल्या संबंधांमुळे अडथळे आलेले दिसत आहेत."

प्राध्यापक पंत म्हणतात, “भारत हा एक मोठा देश आहे. लहान देशाशी संबंध बिघडले तर मोठ्या देशावर त्याचा कमी परिणाम होतो. गेल्या सात वर्षांपासून भारताचे पाकिस्तानशी राजनैतिक संबंध नसूनही त्याचा भारतावर परिणाम झाला नाही. त्याचा परिणाम पाकिस्तानवर नक्कीच झाला आहे. भारतासोबतचे संबंध बिघडवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे बांगलादेशने ठरवले असेल, तर त्यांना कोण रोखणार"अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना. " loading="lazy" width="800" height="449" style="aspect-ratio:16 / 9" class="bbc-139onq"/>