मधुरिमाराजेंची माघार, सतेज पाटलांचे अश्रू; कोल्हापुरातल्या माघारनाट्यामागची कहाणी

फोटो स्रोत, Facebook
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Twitter,
'कोल्हापूर उत्तर' विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनं इतकी वळणं घेतली आहेत की, आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे दोन तर विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. त्यातही कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्यासमोरची आव्हाने, यांची चर्चा आपण याआधी एका विश्लेषणाच्या माध्यमातून सविस्तरपणे केली आहे. ते तुम्ही इथे वाचू शकता.
मात्र, यंदा 'कोल्हापूर दक्षिण'पेक्षाही 'कोल्हापूर उत्तर'ने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात उमेदवार देण्यामध्ये काँग्रेसकडून झालेले घोळ यामुळे ही निवडणूक प्रचंड रंगात आली आहे.
आधी काँग्रेसकडून राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर होणं, मग ऐनवेळी त्यांच्याऐवजी मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी देऊ करणं, राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणं आणि अगदी शेवटच्या क्षणी मधुरिमाराजे यांनी आपला अर्ज माघारी घेणं, या सगळ्या नाट्यमय वळणांमुळेच ही निवडणूक इतकी चुरशीची बनली आहे.
'अर्ज माघारनाट्या'मुळे काँग्रेसचे कोल्हापूरचे प्रमुख नेते सतेज पाटील यांनी आधी संतापून जाण्याचे आणि नंतर कार्यकर्त्यांसमोर अक्षरश: रडण्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने या निवडणुकीला आता भावनिक किनारही प्राप्त झाली आहे.
सध्या या मतदारसंघातील प्रमुख दावेदार कोण आहेत? इतक्या ट्विस्टनंतर कुणासमोरचं आव्हान अधिक वाढलंय आणि या मतदारसंघात इतके ट्विस्ट का पाहायला मिळाले, याचा राजकीय विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून आपण आढावा घेणार आहोत.
इथून झाली नाराजीनाट्याची सुरुवात
उत्तर कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूर शहराचा मुख्य भाग अथवा जुनं कोल्हापूर म्हणवला जाणारा भाग मोडतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं इतर मतदारसंघांशी तुलना करता हा मतदारसंघ लहान आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार आहेत.
राजेश क्षीरसागर हे 2009 आणि 2014 साली याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, 2019 साली भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या चंद्रकांत जाधव यांनी राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता.
2022 साली चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना निवडून आणण्यामध्ये सतेज पाटील यशस्वी ठरले.
आता 2024 सालच्या या निवडणुकीमध्ये अर्थातच जयश्री जाधव पुन्हा एकदा याच मतदारसंघातून उमेदवारीसाठ इच्छुक होत्या. मात्र, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्याच शिवसेनेत प्रवेश केला.
या मतदारसंघातून आधी 27 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत काही नगरसेवकांनी नाराजीचं पत्र दिल्यानंतर उमेदवारीसाठी त्यांचं नाव मागे घेत मधुरिमा राजे छत्रपती यांचं नाव जाहीर करण्यात आलं.
खरंतर इथंच या नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला. आपल्याला विश्वासात न घेताच परस्पर उमेदवारी काढून घेतल्याचा दावा करत राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी भरण्याचा निर्णय घेतला. ही आपली आत्मसन्मानाची लढाई असल्याचा त्यांचा दावा आहे.

फोटो स्रोत, Facebook/Malojiraje Chhatrapati
मधुरिमाराजे या कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. खानविलकर हे सहावेळा आमदार आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीही राहिले होते.
त्या सध्याचे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या सून, तर याच कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून 2004 साली आमदार राहिलेल्या मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आहेत.
मालोजीराजे छत्रपती यांचा 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
मधुरिमाराजे यांनी सोमवारी (4 नोंव्हेबर) मुदत संपण्याला अगदी काही मिनिटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
हाच या मतदारसंघातल्या नाट्याचा दुसरा अंक ठरला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेलं नाट्य सध्या चर्चेला कारण ठरलं आहे.


काँग्रेसमधील घोळामागची कारणं काय?
अर्ज मागे घेण्याचा प्रकार घडल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे आधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संतापलेले दिसून आले.
"निवडणूक लढवण्यासाठी दम नव्हता तर मग मला कशाला तोंडघशी पाडलं");