मूल होत नाही, म्हणून जोतिबांनी तेव्हा जे केलं, ते आज का होत नाही?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लक्ष्मी यादव
- Role, बीबीसी मराठीसाठी
"माझ्या ओळखीतली बाई सवाष्ण म्हणून जेवायला बसली होती. एका बाईनं तिला मूल असलेली सवाष्ण हवी, मूल नसलेली नको असं म्हणून जेवणाच्या ताटावरुन उठवलं. ती बाई घरी जाऊन दरवाजा बंद करून रड रड रडली. ती दरवाजाच उघडत नव्हती. ती स्वत:चं बरं वाईट करून घील म्हणून नवरा लई घाबरला. महिनाभर ती बाई नवर्याला पण बोलत नव्हती. आता ती घराबाहेरच जात नाही," विमल (नाव बदललेलं आहे) तिच्या गावातील एका स्त्रीबद्दल सांगते.
विमल, वय 48, नवऱ्याचे निधन होऊन 20 वर्षे झालेली, मूल न झालेली. पश्चिम महाराष्ट्रातील एका लहानग्या गावची रहिवासी.
विमल पुढे म्हणते, "मूल नसलं की लोक पुरुषाचाही अपमान करतात. ह्याला मूल होत नाही, 'वासना बरी तर पदरात तुरी,' म्हणतात. पुरुषाला तर आपलं दु:ख मांडताच येत नाही. तो रडुबी शकत नाही. त्याला हिणवतात. असा पुरुष कुणाबरोबर जास्त बोलत नाहीत, कुणात जास्त मिसळत नाहीत. गावातली इतर पुरुष माणसं त्याला बघून फिदिफिदी हसतात, कशात नीट मिसळून घेत नाहीत."
ज्या प्रमाणे विमल यांनी मूल न झाल्यावर दाम्पत्यांची स्थिती काय होते हे सांगितलं, तर 'अम्मा' यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव मला सांगितला.
"मला रात्र रात्र झोप लागत नव्हती. मी खाणं सोडून दिलं होतं. अचानक झोपेतून दचकून उठायचे, थरथर कापायचे. कुणाशीही बोलायचे नाही. लहान मुलांकडं पाहिलं की टेन्शन यायचं. आपल्यालाच मूल का नाही याचा त्रास व्हायचा. सगळे लोक मला 'पागल' झाली बोलायचे. मला दवाखान्यात नेण्यात आलं. सगळ्या टेस्ट झाल्या. डॉक्टर बोलले काही झालेलं नाही. बाळ होत नाही याचा त्रास होतो आहे. मेंटल प्रॉब्लेम हैं," पन्नाशीकडं झुकलेल्या अम्मा सांगत होत्या.