सफरचंद, पर्यटनावरील बहिष्कारानं पाकिस्तानची साथ देणाऱ्या तुर्की, अझरबैजानला धडा मिळेल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण भारत देश हादरला होता. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये जो संघर्ष निर्माण झाला, त्यामध्ये तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणं पसंत केलं.
त्यांच्या या भारतविरोधी भूमिकेमुळे भारतीय नागरिकांनीही सोशल मीडियावर तुर्की आणि अझरबैजानच्या विरोधात भूमिका घेत बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली.
अनेक भारतीय व्यापारी, पर्यटक आणि पर्यटन कंपन्यांनी तसेच देशातील विविध खासगी संघटनांनीही तुर्की आणि अझरबैजान यांच्याविरोधातील या बहिष्काराच्या लाटेत 'नेशन फर्स्ट' अशी भूमिका घेतली आहे.
भारतीय नागरिकांकडून या दोन देशांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर #BoycottTurkey, #NoTravelToTurkey आणि #BoycottAzerbaijan असे हॅशटॅग्स ट्रेंडमध्ये असल्याचं पाहायला मिळालं.
8 मे रोजी पाकिस्तानकडून भारतावर झालेल्या हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं पाडलेले ड्रोन हे तुर्की बनवटीचे सोंगर ड्रोन असल्याचा दावाही भारतानं केला होता. त्यानंतर देशभरात तुर्कीविरुद्ध संतापाची लाट उसळली.
शिवाय, भारत-पाकिस्तान संघर्षाच्या या काळात, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पाकिस्तानातील लोक 'आपले बंधू' असल्याचं संबोधित केलं होतं.
तसेच पहलगाम हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीच्या पाकिस्तानच्या प्रस्तावालाही त्यांनी पाठिंबा दिला. या आधीही तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यिप एर्दोगान यांनी याआधीही संयुक्त राष्ट्रांत काश्मीर प्रश्नासंदर्भात भारतविरोधी भूमिका घेतली होती.
त्यामुळेच, आता तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांविरोधात भारतीयांनी सुरू केलेल्या बहिष्कार मोहिमेची तीव्रता किती आहे? तसेच यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला कसा फटका बसू शकतो हे जाणून घेऊया.
बहिष्काराचा पर्यटनावर फटका
तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात. यामुळे तिथल्या पर्यटनक्षेत्राला आणि अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होत असतो.
पण या देशांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारतीय पर्यटकांनी त्यांच्याकडं पाठ फिरवायला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे.
MakeMyTrip, EaseMyTrip, Cox & Kings, ixigo, आणि gohomestays यांनीही त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत तुर्की आणि अझरबैजान या देशांविरोधात निषेध व्यक्त केला आहे.
या देशातील पर्यटनासंदर्भातील सर्व बुकिंग रद्द करून, यापुढं या देशांसाठी नवीन टूर पॅकेजेस आणि बुकिंग घेण्यास नकारही दिला आहे.
EaseMyTrip चे संस्थापक प्रशांत पिट्टी आणि निशांत पिट्टी यांनीही तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात भूमिका मांडली.
प्रशांत पिट्टी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "एक कंपनी म्हणून Ease My Trip, नेहमीच राष्ट्राचा विचार प्रथम आणि व्यवसायाचा नंतर करतो. अझरबैजान आणि तुर्कीसारखे देश इतिहासाच्या चुकीच्या बाजूला उभे असल्याचं आपण पाहत आहोत."
भारताविरोधी कारवायांमध्ये जे देश पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत, भारतावर हल्ला करण्यासाठी ड्रोन देखील पुरवत आहेत अशा तुर्की आणि अझरबैजानमध्ये प्रवासासाठी जाऊ नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.

फोटो स्रोत, twetter\X
या बहिष्कार मोहिमेला जोर आल्यापासून 22 टक्के लोकांनी तुर्कीला जाणारी त्यांची बुकिंग रद्द केली आहे, तर 30 टक्के लोकांनी अझरबैजानला जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत, ही संख्या अजून वाढत जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पिट्टी यांच्या अंदाजानुसार, गेल्या वर्षी 2.5 लाख भारतीयांनी तुर्कीला आणि 2.3 लाख भारतीयांनी अझरबैजानला प्रवास केला. त्यावेळी एका प्रवाशानं सरासरी 1 लाख रुपये खर्च केले असतील, तर हा अंदाज पकडता पर्यटकांनी या देशांकडे पूर्ण पाठ फिरवल्यास त्यांना सुमारे 5,000 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.
तर निशांत पिट्टी यांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटलं की, "जेव्हा हे देश उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देतात, तेव्हा आपण त्यांच्या पर्यटनाला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी का");