तर आईन्स्टाईन 6000 रुपये पगारावर भारतात कुलगुरू झाले असते

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Twitter,
जेव्हा जेव्हा अल्बर्ट आईनस्टाईन अणि भारताचा एकत्र उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा आईनस्टाईनचं महात्मा गांधींविषयी उच्चारलेलं एक वाक्य कायम उद्धृत केलं जातं. आईनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते: "येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता."
विश्वशांतीसाठी, विशेषत: महायुद्धोत्तर जगात, झोकून देऊन काम करणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईन यांना पराकोटीच्या हिंसेलाही अहिंसेनं उत्तर देऊन सत्याग्रहाचं तत्वज्ञान प्रत्यक्ष जगून दाखवणारे महात्मा गांधी यांच्याबद्दल आकर्षण असणं स्वाभाविक होतं.
गांधींच्या हयातीपासून आजपर्यंत ते सगळ्याच जागतिक नेत्यांना आहे. आईनस्टाईन अपवाद नव्हते आणि ते केवळ आकर्षण राहिलं नाही तर नंतर ते ऋणानुबंधही झाले.
पण आईनस्टाईनचा भारताशी असलेला संबंध केवळ गांधींपुरताच सीमित नाही. आईनस्टाईन कधी प्रत्यक्ष भारतात आले नाहीत, पण या प्रदेशाविषयी त्यांना कायमच कुतुहल होतं. अनेक प्रकारची त्यांची मतं होती.
त्यांच्या स्वत:च्या आणि त्यांच्याविषयीच्या उपलब्ध प्रकाशित लिखाणातून ते स्पष्ट दिसतं. शिवाय, काही समकालीन भारतीयांशी त्यांचे जुळलेले ऋणानुबंध, मैत्र हेही जपून ठेवावं आणि साजरं करावं असं.