उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे सभा: 1 यू टर्न, 1 कार्यक्रम, 6 हुकूमशहांचा संदर्भ निवडणुकीत मतं मिळवून देईल?

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, ANI

  • Author, नीलेश धोत्रे
  • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Twitter,

लोकसभा, विधानसभा आणि सर्व महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांचं घोडामैदान आता दूर नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून त्याचाच प्रत्यय येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर दसरा मेळावा घेतला.

मराठा आरक्षण हा या निवडणुकांमध्ये कळीचा मुद्दा ठरू शकतो याची कल्पना दोन्ही नेत्यांना आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांची स्तुती करत थेट मोदी सरकार आणि भाजपवर हे प्रकरण टोलवण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या रुपानं एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहाता त्यांनी पुन्हा आंदोलन करू नये यासाठी शिंदे सरकारचा प्रयत्न असेल.

तर उद्धव ठाकरे यांनी जरांगेंची स्तुती करून एक प्रकारे त्यांच्या आंदोलनाला हवा देऊन शिंदेच्या अडचणी कशा वाढतील याची तजवीज केली आहे.

जाता जाता उद्धव ठाकरेंनी जरांगे पाटलांना भाजपापासून सावध राहाण्याचा इशाराही देऊन टाकला. नाराज मराठा मतं आगामी काळात आपल्या बाजूने कशी वळतील याचा प्रयत्न म्हणूनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या या सल्ला आणि स्तुतीकडे पाहता येऊ शकतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तसं मराठा मूक मोर्चावेळी सामनातून प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून तेव्हाच्या शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर नामुष्की ओढावली होती हे विसरून चालणार नाही. तेव्हा व्यंगचित्र मागे घेत सामनाला माफी मागावी लागली होती हा अलीकडचा इतिहास आहे.

पण तो इतिहास विसरून उद्धव ठाकरे यांनी पुढे पाऊल टाकलं आहे हे खरं.

जरांगेंना पाठिंबा देण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेऊन स्वतःला एका जाळ्यात अडकवून घेतल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांना वाटतं.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले.

“एकनाथ शिंदें यांनी एक प्रकारे इंदिरा गांधीप्रमाणे भाषण केलं. येत्या काळात राज्यात आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्यात सरकार प्रत्येकाला ‘आम्ही करू’ असं आश्वासन देत आहे. कुणाला तरी खरं ते स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. लोक आशेवर आहेत. राज्य सरकारला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल.

शपथ घेऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतःला एका जाळ्यात अडकवून घेतलं आहे. त्यातून सुटका करून घेणं त्यांच्यासाठी अवघड होणार आहे. राज्यात आता प्रत्येक जातीला असुरक्षित वाटायला लागलं आहे. ओबीसींना त्यांच्या आरक्षणात वाटेकरी वाढण्याची भीती वाटतेय. धनगरांना एसटीमध्ये घ्याला आदिवासींचा विरोध आहे. जरांगेंनी आता त्यांच्या बरोबर धनगरांना देखील घेतलं आहे. अशात दुर्दैवानं शिंदे सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त ठरते.”

निवडणूक कार्यक्रम

अर्थात निवडणुकीचं राजकारण हे बेरजेचं राजकारण असतं हे आता एव्हाना उद्धव ठाकरे यांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. (म्हणूनच ते प्रकाश आंबेडकरांशीसुद्धा जुळवून घेत आहेत.)

पण निवडणुकांच्या आधी कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागतो. त्यांच्या उत्साह संचारेल असं काहीतरी करावं लागतं.

यंदा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तो कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या 1 रुपयाच्या कृषी विम्याचा विषय ग्रामीण भागात चांगलाच गाजतोय. राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांची खरिपाची पिकं वाया गेली आहेत. परिणामी त्यांना विम्याच्या रकमेची अपेक्षा आहे. पण, अनेक ठिकाणी शेतकरी या कृषीविम्याच्या निकषांमध्ये बसत नसल्याची ओरड होते आहे.

उद्धव ठाकरे यांनी हे हेरून त्यांच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी विमा अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आदेश दिला आहे. “त्यांना मारझोड करू नका, घेराव घाला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई-ठाणे वगळता उर्वरित भागातल्या शिवसेना कार्यकर्त्यांना कार्यक्रम देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या विषयाला सुद्धा हात घातला.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ANI

पुन्हा तोच राग आळवला

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा दिल्लीचा डाव असल्याचा राग त्यांनी पुन्हा एकदा आळवला आहे. मुंबईचं महत्त्व कमी करत असल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला.

“मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्याच्या शरीराचे तुकडे करू, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं तर तुमचं सरकार जाळू,” वगैरे सारखी वक्तव्यं त्यांनी केली. पण ती पुरेशी नसल्याचं बहुदा त्यांना लक्षात आलं असावं म्हणूनच त्यांनी यंदा धारावीच्या पुनर्वसनाच्या मुद्द्याला हात घालून भाजपला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला.

"हे लोक आता धारावीही गिळायला निघाले आहेत. आता ज्याच्या घशात धारावी यांनी घातली आहे, तो यांचा मित्र आहे. 150 कोटी स्क्वेअर फूटांचा एफएसआय मिळणार आहे. हा विकास फक्त तुमच्या मित्राचे खिसे भरायला होऊ देणार नाही."

"धारावीत जो झोपडीत राहतो, त्याला हक्काचे घर मिळालंच पाहिजे. पण प्रत्येक घरात जे उद्योगधंदे आहेत, त्यांनाही तिथं जागा मिळावी.धारावीच्या एका जागेत घरं बांधा, पण गिरणी कामगारांच्या मुलांनाही तिथं घरे द्या. पोलिसांना घरं कमी पडत असतील तर त्यांनाही तिथं घरे द्या. फक्त धनदांडग्यांची मुंबई करू नका," असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

शिंदे

फोटो स्रोत, ANI

शिवाय या मुद्द्यावर धारावीत वेगळी सभा घेऊन आणखी भूमिका स्पष्ट करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. एकंदरच येत्या काळात हा उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा मुद्दा असणार आहे असं दिसून येतंय. (धारावी तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचा गड मानला जातो.)

मोदींचं नाव न घेता टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सभांमधून कायम घराणेशाहीवर प्रहार करत असतात. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात स्वतःच्या घराणेशाहीचं समर्थ करत नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी त्यांच्या भाषणात एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नाही. पण त्यांची थेट तुलना त्यांनी वेगवेगळ्या हुकूमशहांशी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले,

“मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाहीत, ते घराणेशाहीवर बोलणारे कोण");