पक्षांतर करताना धंगेकर म्हणतात, 'सत्तेशिवाय जनतेची कामं होत नाहीत'; हे म्हणणं किती खरं?

फोटो स्रोत, Facebook/Ravindra Dhangekar
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Twitter,
पुण्यातील काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसकडून कसबा विधानसभा मतदारसंघात आमदार राहिलेले आणि पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवलेले रविंद्र धंगेकर लीलया सत्ताधारी पक्षात गेले.
जाताना ते म्हणाले, "लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामं करू शकत नाही. तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील. मात्र, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत."
रविंद्र धंगेकर हे झालं निमित्त. अशाच स्वरुपाचं विधान करणारे ते काही पहिले 'सत्तावासी' नाहीत. अलीकडच्या काळात ज्यांनी ज्यांनी भाजप अथवा सत्तेतील पक्षासोबत जाण्याचा मार्ग निवडला आहे, त्यांनी 'शब्दश:' अशीच विधानं करुन सत्तावासी होण्यामागचं कारण दिलंय.
सत्तेशिवाय खरंच जनतेची कामं करता येत नाहीत का? सत्तेबाहेर राहून समाजकारण आणि राजकारण करणं अवघड आहे का? आणि तसं होत असेल, तर का? याचा हा धांडोळा...