अमेरिकेत जाण्यासाठी गाढवावर बसलो, उपाशी जंगलात फिरलो अन् आता परत पाठवलं, स्थलांतरितांची कहाणी

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
अमेरिकेनं 104 बेकायदा स्थलांतरितांना भारतात परत पाठवलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं बेड्या घालून भारतीय नागरिकांना आणलं आहे, त्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेत बेकायदेशीररित्या गेलेल्या भारतीयांबाबत आता रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.
हरियाणातील कुरक्षेत्र जिल्ह्यातील एका छोट्या गावातील खुशप्रीत सिंग सहा महिन्यांपूर्वी 45 लाख रुपये खर्च करुन अमेरिकेला गेला होता.
खुशप्रीतच्या वडिलांनी आपली जमीन, घर आणि जनावरांवर कर्ज घेऊन खुशप्रीतला अमेरिकेला पाठवलं होतं.
22 जानेवारीला मी अमेरिकेची सीमा पार केली आणि त्यांनी दोन फेब्रुवारी रोजी मला परत पाठवलं, असं खुशप्रीत सांगतो.
तो म्हणाला," केवळ पाणी पिऊन जंगलातून प्रवास करायचा. बरोबरच्या सहकाऱ्याची साथ सुटली तर मागं वळून पाहायचंही नाही. फक्त आपला मार्ग पकडून चालत राहायचं. गाईडला जो फॉलो करेल तोच हे जंगल पार करु शकतो. जो मागे राहिल तो कायमचा मागेच राहतो."

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
अमेरिकेत पकडल्यानंतर खुशप्रीतला 12 दिवसांपर्यंत स्थलांतरितांच्या शिबिरात ठेवण्यात आलं होतं.
"पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला भारतात पाठवणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी आम्हाला ते आमची मस्करी करत आहेत, असं वाटलं. परंतु, ते याबाबत गंभीर होते," असं त्यानं सांगितलं.
खुशप्रीतने त्याला लष्करी विमानात कसं बसवलं आणि त्यांना कशी वागणूक मिळाली याची माहिती दिली.
"जेव्हा त्यांनी आम्हाला बेड्या घातल्या, तेव्हा आम्ही गंभीर झालो. सुरुवातीला त्यांनी आम्हाला वेलकम सेंटरला नेलं जाणार असल्याचं सांगितलं. तिथं गेल्यावर आम्हाला सोडलं जाईल, असं वाटलं. परंतु, जेव्हा आम्ही तिथं उतरलो, त्यावेळी समोर लष्करी विमान होतं," असं खुशप्रीत म्हणाला.
काही दिवसांपासून ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलं, त्यामुळं खुशप्रीत खूपच अस्वस्थ दिसत होता. अमेरिकेत पोहोचण्यासाठी खूप पैसा खर्च झाला आणि त्याला त्याचे पैसे परत मिळण्याची अपेक्षा आहे. 'आमचे पैसे परत मिळाले तर आम्ही इथं काही काम तरी करू,' अशी आशा त्यानं यावेळी व्यक्त केली. यापुढं आता कधीच परदेशात जाणार नाही," असंही त्यानं म्हटलं.
खुशप्रितचे वडील भावूक झाले होते. "आम्हाला आमचे पैसे परत द्या. पूर्ण देता येत नसतील तर अर्धे तरी द्या," ही मागणी करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
'वाटेत मृतदेहही दिसले'
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील उरमर तांडा येथील सुखपाल सिंग यांनी सांगितलं की, ते जंगल आणि समुद्रामार्गे अमेरिकेत गेले होते.
बीबीसीचे प्रतिनिधी प्रदीप शर्मा यांच्याशी बोलताना सुखपाल यांनी चार महिन्यांपूर्वीच घर सोडल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
या प्रवासात आलेल्या अडचणींबाबत बोलताना ते म्हणाले की, "मी हात जोडून सर्वांना सांगू इच्छितो की, कोणत्याही चुकीच्या मार्गानं जाऊ नका. इथं कमी खायला मिळालं तरी ते खा. एकतर तिथं खायला मिळत नाही, पैसेही हिसकाऊन घेतले जातात आणि कोणती सुरक्षाही मिळत नाही."
ते म्हणाले की, "त्यांनी आधी आम्हाला इटलीला नेले. त्यानंतर लॅटिन अमेरिकेत आणलं. आम्ही सुमारे 15 तास बोटीनं प्रवास केला. डोंगरात 45 किलोमीटर चाललो. जो कोणी तिथं खाली पडेल त्याला ते तिथंच सोडून देतात. आम्हाला वाटेत अनेक मृतदेह दिसले."

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
होशियारपूर जिल्ह्यातील दसूआ येथील हरविंदर सिंग यांची कथाही अशीच आहे. ते म्हणाले की, मला सुरुवातीला दिल्ली, त्यानंतर कतार आणि मग ब्राझीलला नेण्यात आलं.
त्यांनी म्हटलं की, "ब्राझीलला गेल्यावर मी दोन दिवस एका हॉटेलमध्ये राहिलो. त्यानंतर त्यांनी मला पेरु येथून एक फ्लाइट असल्याचं सांगितलं. आम्ही बसनं पेरुला गेलो. पण, तेथून आमच्यासाठी कोणतंच विमान नव्हतं. मग आम्ही टॅक्सीनं पुढं गेलो."
या सर्वासाठी माझे 42 लाख रुपये खर्च झाले, असं हरविंदर म्हणाले.
"जेव्हा आम्ही पनामाला गेलो तेव्हा तिथं अडकलो. तिथं एक-दोन मुलांचा मृत्यू झाला. एक जण समुद्रात बुडाला तर एकाचा जंगलात मृत्यू झाला," असं त्यांनी सांगितलं.
'वैध व्हिसा असूनही पकडून, परत पाठवलं'
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील जगराव गावातील मुस्कान तीन वर्षांसाठी स्टडी व्हिसावर ब्रिटनला गेली होती.
तिच्या व्हिसाचा कालावधी अजून दोन वर्षे शिल्लक होता, पण तरीही अमेरिकेत पोहोचताच तिला भारतात परत पाठवण्यात आलं.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार गुरमिंदर ग्रेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती 5 जानेवारी 2024 रोजी ब्रिटनला गेली होती.
मुस्कान म्हणाली, "अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील तुहावना येथे आम्ही फिरायला गेलो होतो. पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि त्यांच्याबरोबर घेऊन जाणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला 10 दिवस त्यांच्याबरोबर ठेवलं. आम्हाला त्यांनी चांगली वागणूक दिली."
"कॅलिफोर्नियाचे पोलीस आम्हाला घ्यायला आले होते. त्यांनी आम्हाला भारतात पाठवलं. इथं आल्यानंतरच आम्हाला समजलं की आम्ही भारतात आलो आहोत. आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली. आम्ही वैध व्हिसावर गेलो होतो. आम्ही कोणतीच सीमा ओलांडली नव्हती किंवा भिंत चढून त्यांच्या देशात गेलो नव्हतो."

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
ती म्हणाली, "माझ्याकडे अजूनही ब्रिटनचा वैध व्हिसा आहे. परंतु, आम्हाला सांगण्यात आलं आहे की, आम्ही आता पाच वर्षे कुठं जाऊ शकणार नाही."
मुस्कानचे वडील जगदीश कुमार म्हणाले, "आम्ही मुलीचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून तिला पाठवलं होतं. परंतु, तिच्याबरोबर धक्काबुक्की करण्यात आली. सरकारनं याकडं लक्ष द्यायला हवं. आम्ही कर्ज काढून मुलीला पाठवलं होतं."
मुस्कानच्या घरी गेलेल्या आम आदमी पक्षाच्या आमदार सरबजित कौर मनुके यांनी म्हटलं की, "मुस्कानकडे अजूनही दोन वर्षांचा ब्रिटनचा वैध व्हिसा असताना तिला परत पाठवण्यात आलं, याचं मला आश्चर्य वाटतं."
"माझे आणि मुस्कानच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध आहेत. आमची मुलगी तुहावाना येथे फिरायला गेली होती. अमेरिकेसारख्या देशाकडून अशी अपेक्षा नाही."
स्वप्नं उध्वस्त झालं
पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील फतेहगड चुडियामधील जसपाल सिंग यांना अमेरिकेत जाऊन केवळ 11 दिवस झाले होते. त्यांना पकडून पुन्हा भारतात पाठवण्यात आलं.
बीबीसी प्रतिनिधी गुरप्रीत चावला यांच्याशी बोलताना जसपाल यांनी जड अंतःकरणानं त्याचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न उद्धवस्त झाल्याचं सांगितलं.
साधारण अडीच वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेचा प्रवास सुरू झाला होता. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं 40 लाख रुपये खर्च केले होते.
बुधवारी 104 भारतीयांना अमेरिकेच्या लष्करी विमानानं भारतात पाठवण्यात आलं. यात जसप्रीतचाही समावेश होता.


2022 मध्ये व्हिजिटर व्हिसावर मी इंग्लंडला गेलो होतो. तिथं माझी ओळख स्पेनच्या एका पंजाबी एजंटशी झाली, असं जसपाल सिंग सांगतात.
मग जुलै 2024 मध्ये ते युरोपला गेले. यानंतर जवळपास 6 महिने वेगवेगळ्या देशांमध्ये घालवल्यानंतर पनामाच्या जंगलातून त्यांना अमेरिकेचा मार्ग मिळाला.

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
जसपाल सांगतात की, "गाढवावरून प्रवास करण्याचा अनुभव खूपच धोकादायक होता. मी फक्त मुलांचेच नव्हे तर मुलींचेही मृतदेह तिथे पडलेले पाहिले. मला सांगाडेही दिसले. प्रवासादरम्यान आम्हाला खाण्यासाठी फक्त थोडासा ब्रेड आणि एक-दोन बिस्किटं मिळाली."
सीमा ओलांडल्यानंतर अमेरिकन सैन्याने आम्हाला अटक केली, असं जसपाल यांनी सांगितलं.
जसपाल म्हणाले, "आमचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला. विमानात चढल्यानंतर माझे हात-पाय बांधले गेले. विमान अनेक ठिकाणी थांबले, पण अमृतसरला पोहोचल्यानंतरच माझे हात-पाय मोकळे करण्यात आले."
'जमीन विकली, होत्याचं नव्हतं झालं'
हरियाणातील कुरुक्षेत्र येथे राहणारे रॉबिन हांडाही अमेरिकेचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 7 महिन्यांपूर्वी रवाना झाले होते.
त्यांनाही अमेरिकेनं भारतात परत पाठवलं. हांडा कॉम्प्युटर इंजिनीअर आहेत. उज्वल भविष्याच्या शोधात ते अमेरिकेला गेले.
हरियाणातील बीबीसीचे प्रतिनिधी कमल सैनी यांनी रॉबिन हांडाशी संवाद साधला.
रॉबिन हांडा यांनी सांगितलं की, "मी 7 महिन्यांपूर्वी अमेरिकेला जाण्यासाठी घरुन निघालो होतो. मला एक महिना विविध ठिकाणी रोखलं गेलं. या प्रवासात मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कधी मला खायला अन्न मिळालं तर कधी नाही. कधी समुद्रात, कधी बोटीतून, कधी लोकांनी माझे पैसे हिसकावून घेतले. अनेक प्रकारच्या समस्यांना मला सामना करावा लागला."
रॉबिन हांडा म्हणाले, "मी 22 जानेवारी रोजी सीमा ओलांडली. मग आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि स्वतःला अमेरिकन लष्कराच्या स्वाधीन केलं. त्यांनी आम्हाला एका शिबिरात नेलं. तिथं आमच्याशी एखाद्या गुन्हेगारासारखं वर्तन करण्यात आलं."
"शिबिरातून आम्हाला कुठं नेलं जाणार आहे, हेही सांगण्यात आलं नाही. आमचे हात-पाय साखळदंडांनी बांधले होते. लष्करी विमान पाहिलं, तेव्हा आम्हाला धक्काच बसला," असं ते म्हणाले.
"अशा पद्धतीने विदेशात जाण्याचा सल्ला मी कोणालाही, देणार नाही. हा खूप खडतर मार्ग आहे," असं हांडा म्हणतात.

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
मुलाला अमेरिकेत पाठवण्यासाठी 45 लाख रुपये खर्च केल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं.
ते म्हणाले, "एजन्सीनं आम्हाला फसवलं. एका महिन्यात तो अमेरिकेत जाईल असं सांगण्यात आलं. पण 6-7 महिने त्याला भटकण्यास भाग पाडलं. त्याचा छळ केला गेला. त्याला इलेक्ट्रिक शॉकही दिला."
"मुलाला मारहाण करतानाचे व्हीडिओही आमच्याकडे आहेत. त्याला चांगली नोकरी मिळेल म्हणून जमीनही विकली. पण असं काहीच झालं नाही, असं हताश होऊन ते सांगत होते."
यावेळी रॉबिनच्या आजी खूप भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, "जमीन विकल्यानंतर माझा मुलगा बेरोजगार झाला. भूकेनं माझा मुलगा तडफडत होता."
"त्यानं धान विकून बाहेर पाठवलं. धान विकल्यामुळे त्याचे आजोबाही आजारी पडले. त्यांनी हे खूपच मनावर घेतलं आणि आता तर त्यांना याबाबत काहीच माहिती नाही."
'अमेरिकेला जाण्यासाठी 50 लाख रुपये खर्च'
पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यातील कहानपुरा गावातील जसविंदर सिंग ऑक्टोबर 2024 मध्ये अमेरिकेला गेले होते.
जसविंदर सिंगचे काका करनेल सिंग यांनी बीबीसीला सांगितलं की, "जसविंदरला पोलीस मध्यरात्री घरी सोडून गेले होते."
आम्हाला बेड्या घालून विमानाने अमेरिकेतून आणल्याचं त्यानं आपल्या कुटुंबीयांना सांगितलं.
जसविंदर सिंगला ज्यावेळी अटक करण्यात आली त्याच्या 22 दिवसांपूर्वीच तो अमेरिकेत गेले होते.

करनेल सिंग सांगतात, "घरी आल्यापासून जसविंदरची प्रकृती बिघडली आहे. कदाचित तो तणावात आहे."
जसविंदर सिंगची सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्याला लुधियाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ते म्हणाले, "जसविंदरनं कुटुंबीयांना सांगितलं की, शिबिरात त्यांना खायला काहीही दिलं गेलं नाही. फक्त अर्ध सफरचंद किंवा ज्यूस दिला जात होता आणि तेही अधूनमधून."
जसविंदरला मोठा भाऊ आहे. दोघे भाऊ शेती करायचे.
गेल्या वर्षी त्यांनी एका एजंटच्या माध्यमातून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेला जाण्यासाठी आम्ही सुमारे 50 लाख रुपये खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, "या पैशांसाठी आम्ही आमचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते आणि नातेवाईकांकडूनही खूप पैसे उधार घेतले होते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)