उद्धव ठाकरेंनी 'मविआ'त 100 पेक्षा कमी जागांवर लढणं हे त्यांच्या फायद्याचं की तोट्याचं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी
- Twitter,
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी '85-85-85' चा फॉर्म्यूला मान्य केला असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
याचा अर्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रत्येकी किमान 85 जागा लढवणार असल्याचे निश्चित झालं आहे. यानुसार, महाविकास आघाडीतील 255 जागांचा तिढा सुटला असून उर्वरित 33 जागांपैकी 18 जागा या छोट्या मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.
तर अद्यापही तिढा न सुटलेल्या 15 जागा आपापसात वाटून घेतल्या जातील, असं बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.
जर असं घडलं आणि असंच घडण्याची अधिक शक्यता निर्माण झालेली असताना शिवसेनेनं इतक्या कमी जागांवर लढणं हे महाविकास आघाडीमध्ये नेमकं कुणाच्या फायद्याचं आहे?
एकेकाळी 200 च्या वर जागा लढवणारी शिवसेना आता 100 च्या खाली जागांवर निवडणूक लढवणार आहे.
जागावाटपावरुन संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये धुसफूस झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. शिवाय, एकूणच जागांचा तिढा सुटण्यापूर्वी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट शंभर किंवा त्याहून अधिक जागा लढवेल, असा दावा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
मात्र, अंतिम जागावाटपामध्ये उर्वरित 15 जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला आणखी 10 जागा येतील, असं गृहित धरलं तरी शिवसेनेच्या एकूण उमेवादारांची संख्या ही 95 च्या वर जात नाही.
या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरेंसाठी महाविकास आघाडीमध्ये 100 पेक्षा कमी जागांवर लढणं हे त्यांच्या फायद्याचं आहे की तोट्याचं, या गोष्टीचं विश्लेषण करणं यथार्थ ठरेल.
राजकीय गणितांचीही फेरमांडणी करणारी सर्वार्थाने 'वेगळी' निवडणूक
2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि पक्षाची दोन शकलं झाली. सध्या विभाजित शिवसेनेचे 'एकनाथ शिंदे' आणि 'उद्धव ठाकरे' असे दोन गट एकमेकांविरोधातील आघाड्यांमध्ये लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचीही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच, 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे.
तीन-तीन पक्षांच्या दोन मोठ्या आघाड्या, तिसरी आघाडी आणि मनसे, वंचित बहुजन आघाडीसारखे इतर अनेक पक्ष या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि जागावाटपाचा गोंधळ अद्यापही सुरुच आहे.

पारंपरिकरित्या सर्व प्रकारची गृहितकं मोडित काढणारी ही निवडणूक असल्याने राजकीय गणितांचीही फेरमांडणी होताना दिसत आहे, अशी मांडणी 'लेट्सअप'चे संपादक योगेश कुटे यांनी केली.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "शिवसेना आणि काँग्रेस यांची विधानसभेसाठी निवडणूकपूर्व अशी युती पहिल्यांदाच झालेली आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या कामाची स्टाईल वेगवेगळी आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांची काम करण्याची पद्धतही वेगळी असल्याने दोन्ही पक्षांतील हा फरक दिसून येतो. ते पहिल्यांदाच युतीमध्ये लढत असल्याने अशी ताणाताणी अपेक्षितच होती."
शिवसेनेनं याआधीच्या निवडणुकांमध्ये किती जागा लढवल्या?
शिवसेनेपुरता विचार करायचा झाल्यास, सध्या महायुतीतील एकनाथ शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी 'गुवाहाटी बंडा'तील साथीदार कायम ठेवले आहेत.
दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट किमान 85 जागा लढवणार असल्याचे निश्चित आहे. यामध्ये आणखी जास्तीतजास्त 10 जागांची भर पडू शकते, त्याहून अधिक जागांची शक्यता कमी आहे. असे घडल्यास शिवसेना (उद्धव ठाकरे) गट 95 जागांच्या आसपासच निवडणूक लढवेल.
2014 च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळल्यास 1990 सालापासून शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवत होते.
1990 पासूनच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसोबतच्या महायुतीतून लढणाऱ्या एकसंध शिवसेनेची आकडेवारी पाहता सध्याची आकडेवारी निश्चितच कमी आहे.
1990 ते 2009 पर्यंत विधानसभांच्या सर्व निवडणुकांमध्ये जागावाटप पाहता अप्रत्यक्षपणे शिवसेना 'मोठ्या भावा'च्या भूमिकेत राहिली.

फोटो स्रोत, ANI
1990 च्या निवडणुकीत शिवसेनेनं 183 तर भाजपनं 105 जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीचा जागावाटपाचा हाच फॉर्म्युला 1995 च्या निवडणुकीतही तसाच ठेवण्यात आला.
1999 साली शिवसेनेनं 171 मधून मित्रपक्षांना 10 जागा सोडल्या होत्या. 2004 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 8, तर भाजपनं 6 जागा सोडल्या होत्या. तर 2009 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 9 जागा सोडल्या होत्या.
2014 साली भाजप आणि शिवसेनेनं युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आणि 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले.
तेव्हा शिवसेनेनं 282 तर भाजपनं स्वबळावर 260 जागा लढवल्या. त्यावेळी भाजपनं 122 तर शिवसेनेनं 62 जागा जिंकल्या होत्या.
2019 साली तत्कालीन महायुतीतील एकसंध शिवसेनेने 124 तर भाजपने इतर मित्रपक्षांसह 164 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेनं 56 तर भाजपनं 105 जागा जिंकल्या होत्या.


शंभरहून कमी जागांवर लढणं हे उद्धव ठाकरेंच्या फायद्याचं की तोट्याचं?
'शंभरहून अधिक जागा लढू' असा दावा करणारी शिवसेना त्याहून कमी जागांवर निवडणूक लढण्यासाठी तयार झाली आहे.
यावर भाजपनं टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "मोठा भाऊ बनायला निघालेली शिवसेना आता 'रामा गडी' बनून राहिली आहे. भाजपने इतकं सन्मानानं वागवून सुद्धा ज्या शिवसेनेनं साध्या छोट्या गोष्टीसाठी तडजोड करायला नकार दिला आणि 'आम्ही मोठा भाऊ' करत ज्यांच्या कडेवर जाऊन बसले, त्यांनी यांना घरचा 'रामा गडी' करुन टाकलं आहे."
दुसऱ्या बाजूला, 'जास्त जागा लढवल्या तर जास्त जिंकता येतील वा स्ट्राईक रेट चांगलाच मिळतो' असं नाही, असं विश्लेषण योगेश कुटे करतात. ते म्हणतात की, "संजय राऊत यांचं शंभरहून अधिक जागा लढवण्याबाबतचं स्टेटमेंट हे ताणण्याची भाषा होती, ती तोडण्याची भाषा नव्हती, हे स्पष्टपणे दिसून येत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
संजय राऊत यांचा हा दावा आग्रहासाठी होता. जेव्हा सगळे जागावाटपासाठी बसले, तेव्हा त्यांनी तो आग्रह मागे घेतलेला दिसून आला आहे. दुसरी गोष्ट अशी की, याआधी जेव्हा भाजप-शिवसेना युती होती तेव्हा शिवसेना 160 पेक्षा अधिक जागांवर लढत असली तरीही शिवसेनेचा सर्वोत्तम स्कोअर हा काही 74 च्या वर कधीही गेलेला नाहीये.
1995 साली बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या झंझावातात या सर्वोच्च जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं, जास्त जागा लढवल्या तर जास्त जिंकता येतील वा स्ट्राईक रेट चांगलाच मिळेल, असं काही नाही."
'दिव्य मराठी'चे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार यांना हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या फायद्याचाच आहे, असं वाटतं.
ते म्हणतात की, "जास्त जागा लढून कमी जागा निवडून आणण्यापेक्षा कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न कधीही चांगला. शरद पवारांनीही याच प्रकारे निवडक आणि विजय मिळेल अशाच जागांवर उमेदवार दिले आहेत."

या बातम्याही वाचा:

भाजपची टीका, शिवसेनेचं प्रत्युत्तर
महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन होणाऱ्या रस्सीखेचाबाबत भाजपने बोचरी टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना महाविकास आघाडीला 'माकड आणि दोन बोके' या गोष्टींची उपमा दिली.
शरद पवारांनी शिवसेनेला वापरुन आपला फायदा करुन घेतल्याचा दावा ते करतात. "संजय राऊत आमचा शंभरचा स्ट्राईक रेट असेल, असं म्हणतात. मात्र, जागाच शंभरच्या वर मिळालेल्या नसताना तो कुठून शंभर असेल? त्यामुळे, अतिअहंकारामुळे नुकसान शंभर टक्के शिवसेनेचंच होणार आहे," अजित चव्हाण म्हणतात.
"या सगळ्यात पक्ष फुटून सुद्धा शरद पवारांचाच फायदा होणार आहे. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा आपला स्ट्राईक रेट कसा उत्तम राहील, याची काळजी घेत, इतर पक्षांमधील माणसं आपल्या बाजूने घेत राष्ट्रवादी काँग्रेसने बोक्याप्रमाणे जागावाटप केलं आहे. धूर्त शरद पवार आणि चलाख काँग्रेसनं 'उबाठा' गटाचा मामा बनवला आहे", असं ते पुढं म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी भाजपच्या या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे गटाची अवस्था काय आहे, असा प्रतिप्रश्न बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केला.
महायुतीतील शिंदे गटाला मिळालेल्या जागांवरुन भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, "शंभरहून अधिक जागा लढायला मिळाव्यात, अशी इच्छा असणं यात गैर काय? अशी इच्छा तर प्रत्येक पक्षाची राहणारच ना");